चक्रीवादळानं होत्याचं नव्हतं केलं! रत्नागिरीत हजारो घरांचं नुकसान, संसार उघड्यावर, 16 कोविड सेंटरमधील वीज खंडित

| Updated on: May 17, 2021 | 8:51 PM

रत्नागिरीत हजारो घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. वादळी वाऱ्यात अनेक झाडं पडली.

चक्रीवादळानं होत्याचं नव्हतं केलं! रत्नागिरीत हजारो घरांचं नुकसान, संसार उघड्यावर, 16 कोविड सेंटरमधील वीज खंडित
तौत्के चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड नुकसान
Follow us on

मुंबई : तौत्के चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवर थैमान घातलंय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालंय. हजारो घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. वादळी वाऱ्यात अनेक झाडं पडली. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 1 हजार 189 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. या पावसात झालेल्या नुकसानाची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून प्राथमिक माहिती देण्यात आलीय. त्यामध्ये तालुकानिहाय झालेल्या घरांच्या नुकसानाची माहिती दिली आहे. (Tauktae cyclone damaged hundreds of houses in Ratnagiri district)

रत्नागिरी जिल्ह्यातील घरांचे नुकसान

मंडणगड तालुक्यात 200 घरांचे, दापोली तालुक्यात 350, खेड तालुक्यात 30, गुहागर 05, चिपळूण 65, संगमेश्वर 102, रत्नागिरी 200, राजापूर 32 असे मिळून एकूण 1 हजार 28 घरांचं नुकसान झालंय. तर रत्नागिरीमध्ये 1, लांजामध्ये 1 आणि राजापूरमध्ये 05 असे एकूण 07 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामध्ये गुहागरमध्ये 1, संगमेश्वरात 1, रत्नागिरीमध्ये 03 आणि राजापूरमध्ये 03 असे एकूण 08 नागरिक जखमी झाले. गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वरात 01 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या असे 4 पशुधन मृत झाले आहेत. जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली असून 14 दुकाने व टपऱ्या, 09 शाळा, तर 21 शासकीय इमारतींचे नुकसान झालं आहे.

वादळामुळे राजापूर तालुक्यात 652 व्यक्ती, रत्नागिरी तालुका 363, दापोली तालुका 2373, मंडणगड तालुका 508, गुहागर तालुका 667 असे एकूण 4563 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार कोणत्याही मच्छिमार बोटी समुद्रात गेलेल्या नाहीत सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 1 हजार 189 मिमी पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी एकूण 1 हजार 189 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड 52 मिमी , दापोली 82 मिमी, खेड 49 मिमी, गुहागर 120 मिमी, चिपळूण 100 मिमी, संगमेश्वर 142 मिमी, रत्नागिरी 274 मिमी, राजापूर 208 मिमी, लांजा तालुक्यामध्ये 162 मिमी पाऊस पडलाय. सदरचा अंदाज हा प्राथमिक स्वरुपाचा असून 17 मे 2021 रोजी पासून संबंधित तहसिलदारांमार्फत प्रत्यक्ष पंचानाम्याला सुरुवात करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

चक्री वादळ, वीज पुरवठा गोषवारा

रत्नागिरी जिल्ह्यातील चक्रीवादळ परिस्थिती मुळे वीज प्रणाली बाधित झाली त्याचा गोषवारा

1- एकूण गावे 1239 पैकी 760 बंद 479 सुरू

2 – एकूण उपकेंद्रे 55 पैकी 27 सुरू 28 बंद

3 – ट्रान्सफॉर्मर 7548 पैकी 1883 सुरू 5665 सुरू होणे बाकी

4 – एकूण वीज कनेक्शन 545120 पैकी 187711 सुरू 357409 सुरू होणे बाकी

5 – HT पोल 164 बाधित

6 – LT पोल 391 बाधित

7 – HT लाईन नादुरुस्त 49 किलोमीटर

8 – LT लाईन नादुरुस्त 117 किलोमीटर

9 – ट्रान्सफॉर्मर 15 नादुरुस्त झाले आहेत.

16 कोविड सेंटरमध्ये वीज गायब

तौत्के चक्रीवादळाचा फटका रत्नागिरीतील कोविड रुग्णांनाही बसलाय. जिल्ह्यातील 19 कोविड सेंटरमध्ये अद्याप वीज पुरवठा पुर्ववत नाही. एकूण 39 कोविड रुग्णालयांपैकी 23 रुग्णालयांमधील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. पण अद्याप 16 कोविड रुग्णालयातील वीज पुरवठा पुर्ववत झालेला नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. तर एकूण 3 ऑक्सिजन प्लान्ट पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. या चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका बसल्याचं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

संबंधित बातम्या :

Cyclone in Mumbai: मुंबईत डेंजर वारा, पावसाचा मारा, विमान-लोकल सेवा ठप्प, राज्यात 6 जण दगावले; धोका अजून कायम!

Cyclone in Maharashtra : सिंधुदुर्गला सर्वाधिक फटका, रस्ते बंद, बत्ती गुल, नेटवर्क गायब!

Tauktae cyclone damaged hundreds of houses in Ratnagiri district