TET परीक्षेचा पेपरही फुटला, सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रीया, पाच लाखांहून अधिक उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी..

टीईटी पेपर फुटल्याने या परीक्षेची तयारी केलेल्या लाखो शिक्षकांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे. या संदर्भात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

TET परीक्षेचा पेपरही फुटला, सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रीया, पाच लाखांहून अधिक उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी..
TET EXAM CHAOS
| Updated on: Jun 27, 2026 | 10:29 PM

नीट पेपर फुटीनंतर महाराष्ट्रातही आता टीईटी परीक्षा उद्या असताना आज त्याचा पेपर फुटल्याचे जाहीर झाल्याने ही उद्याची परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे दोन लाखाहून अधिक भावी शिक्षकांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. या संदर्भात सर्वस्तरातून सरकारवर चौफेर टीका होत आहे. टीईटी ही परीक्षा शिक्षकांच्या भरतीसाठी घेतली जाते. त्यामुळे या परीक्षेला बसलेल्या २ लाखाहून अधिक शिक्षकांना मोठा मन:स्ताप भोगाला लागला आहे. समाजातील सर्व स्तरातून सरकारच्या या भोंगळ कारभारावर टीका होत आहे.

उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेची तयारी केलेल्या लाखो शिक्षकांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली आहे.एका वाईट प्रवृत्तीच्या माणसाची शिक्षा आम्ही लाखो शिक्षक भोगत आहोत, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. या घटनेची तात्काळ चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी माध्यमिक परीक्षार्थी शिक्षक हेमंत गडकरी यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना केली आहे.

राज्य परीक्षा परिषदकडे पारदर्शकता नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही. 2022-23 ला TET घोटाळा उघड झाल्यावर परीक्षा परिषदेने आणखी सतर्क व्हायला पाहिजे होते. परंतू परीक्षा परिषदेचा भोंगळ कारभार बंद झाला नाही. राज्य परीक्षा परिषदेकडून TET ची परीक्षेची जबाबदारी काढून घेण्यात यावी. त्याचप्रमाणे शालेय शिक्षण विभागाने परीक्षा परिषदकडे जे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची जबाबदारी दिली आहे, ती सुद्धा काढून घेण्यात यावी. परीक्षा परिषदेवर आता उमेदवारांचा विश्वास राहिलेला नाही अशी संतप्त प्रतिक्रीया युवाशाही असोसिएशनचे अध्यक्ष अश्विनी कडू यांनी दिली आहे.

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा – रोहिणी खडसे

टीईटीचा पेपर फुटला म्हणजे हा केवळ एका परीक्षेचा घोटाळा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा आहे. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीची किंमत शून्य करणारी ही व्यवस्था नेमकी कोणाच्या संरक्षणाखाली चालते? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे.

प्रत्येक वेळी पेपर फुटतो, चौकशीची घोषणा होते, काही जणांना अटक होते आणि नंतर काही दिवसांनी सर्वकाही शांत होते. पण विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील गेलेले महिने, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास याची भरपाई कोण करणार? नीट पेपरफुटीचे उदाहरण ताजे असताना टीईटीने पेपर फुटू नये यासाठी योग्य खबरदारी घ्यायला हवी होती. पण कुणाला काही पडले आहे का ? जे स्वतः च फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार ? असाही सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले माहिती घेतो…

यासंदर्भातली माहिती मी अद्याप घेतलेली नाही.घटना घडली की नाही ही तपासाची बाब आहे. मात्र, घटना घडली असेल तरीही अतिशय गंभीर बाब आहे. या अशा घटनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोठी यांनी देखील लक्ष घातले होती. निश्चित यासंदर्भात काय घटना घडली आहे त्याची माहिती घेऊनच बोलणं उचित ठरेल अशी प्रतिक्रीया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात हे काय सुरु आहे – विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? TET पेपर ठाण्यात फुटला आहे.देशपातळीवरील नीट पेपरफुटीचे धागेदोरेही महाराष्ट्रातच सापडले होते. पेपरफुटतात कसे? हे सरकारचे अपयश आहे. सरकारला या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाहीत. या सरकारला विद्यार्थ्यांशी देणंघेणं नाही अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ही मुले मेहनत करतात हे पेपर लीक होतात त्यांचे भविष्य अंधारात जाते. राज्यकर्त्यांना खुर्चीवर बसण्याचा काही अधिकार नाही. वारंवार पेपर फुटतात यावर कायमचा बंदोबस्त कधी करणार? असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

निर्लज्ज सरकार,बेपर्वा प्रशासन – गजानन काळे प्रवक्ते मनसे

उद्या होणारा TET परीक्षेचा पेपर देखील फुटला. सेवेत असणारे शिक्षक आणि नवीन उमेदवार असे ६ लाखांच्यावर उमेदवार या परीक्षेसाठी राज्यातून बसणार होते. या सरकारला धड परीक्षा घेता येत नाहीत. सरकारचा सतत मुलांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. तुमच्या या गोंधळामुळे अजून किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार आहात असा सवाल मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला आहे.सरकार आणि प्रशासन अशी काही गोष्ट शिल्लक आहे का या राज्यात? आमदार,खासदार फोडण्यात व्यस्त असलेल्या सरकार कडून अजून काय अपेक्षा करणार ? निर्लज्ज सरकार,बेपर्वा प्रशासन असल्याचेही मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी म्हटले आहे.

 शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे कारवाईचे आश्वासन

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने देखील काळजी घेतलेली होती.  प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान आहेत असे त्या ठिकाणी दिसून आलेले आहे. संशयितांकडून मिळालेल्या प्रश्नांमध्ये साम्य आढळले आहे.  घडलेला प्रकार गंभीर असून  शासनाने याची गंभीरपणे नोंद घेतली आहे. या प्रकरणात  तात्काळ पोलिसांनी कारवाई करीत ॲक्शन घेतली आहे. पोलीस चौकशीमध्ये ज्या काही बाबीसमोर येतील त्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिल्याचे  शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us