MLC Election : मतदान होण्याआधीच ठाण्यात महायुतीचा गुलाल, एकनाथ शिंदेंचा मोठा विजय

ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी वैयक्तिक कारणास्तव अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित झाला आहे.

MLC Election : मतदान होण्याआधीच ठाण्यात महायुतीचा गुलाल, एकनाथ शिंदेंचा मोठा विजय
eknath shinde
| Updated on: Jun 04, 2026 | 11:40 AM

ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. ठाणे मतदारसंघाची विधानपरिषद निवडणूक आता पूर्णपणे बिनविरोध होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित झाला आहे. महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेले एकमेव विरोधी उमेदवार अभिजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोड

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे विधानपरिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार होती. या निवडणुकीसाठी महायुतीकडून माजी आमदार रवींद्र फाटक आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यावेळी त्या दोघांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते. त्यामुळे या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये थेट लढत होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.

पण अचानक यात एक मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. ठाण्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पवार यांनी अचानक आपला अर्ज मागे घेतला. मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे हा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे, अशी माहिती अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार असलेल्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

बंडखोरी टळली, फाटक यांचा मार्ग मोकळा

या निवडणुकीत सुरुवातीला महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जागेवरून काही प्रमाणात रस्सीखेच पाहायला मिळाली होती. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर ही जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आली. शिंदे गटाकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये या जागेसाठी कोणतीही अंतर्गत बंडखोरी झाली नव्हती. तसेच इतर कोणत्याही अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला नाही. त्यामुळे आता अभिजित पवार यांच्या माघारीनंतर निवडणूक रिंगणात केवळ रवींद्र फाटक हेच एकमेव उमेदवार उरले आहेत. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

रवींद्र फाटक यांचा राजकीय दबदबा

रवींद्र फाटक यांची ठाणे आणि पालघर जिल्ह्यात चांगली राजकीय पकड मानली जाते. यापूर्वी २०१६ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसंत डावखरे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून फाटक यांनी या निवडणुकीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या बिनविरोध विजयामुळे ठाण्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Follow Us