अजितदादा यांचा थेट मनोज जरांगे यांना कडक शब्दात इशारा; जरांगेंचही प्रत्युत्तर…

| Updated on: Jan 07, 2024 | 2:56 PM

ठाणे जिल्हयाचा पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाणार आहे, असे सांगतानाच ठाणे जिल्हा आणि ग्रामीण भागातील जी विकासकामे होत आहेत आणि केली जाणार आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच जिल्ह्यात कोणती कामे सुरू आहेत याची यादीच अजितदादा पवार यांनी यावेळी वाचून दाखवली. तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

अजितदादा यांचा थेट मनोज जरांगे यांना कडक शब्दात इशारा; जरांगेंचही प्रत्युत्तर...
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मयुरेश जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 7 जानेवारी 2024 : काहीही झालं तरी येत्या 20 जानेवारी रोजी आम्ही मुंबईत येणारच. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही येणारच आहोत, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर, कुणीही कायदा हातात घेतला तर त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशा कडक शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे. अजितदादांचा हा इशारा येताच मनोज जरांगे यांनीही पलटवार करत जशास तसे उत्तर दिलं आहे. त्यामुळे अजितदादा आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात येत्या काही काळात चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कल्याणमध्ये आले होते. कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना नाव न घेता कडक इशारा दिला आहे. काही लोक सध्या टोकाचं बोलत आहेत. देशासमोर राज्यासमोर काय प्रश्न आहे हे लक्षात न घेता सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. मुद्दयावर बोलणं सोडून इतर विषयावर बोलत आहेत. मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं आहे. या संविधानाला 75 वर्ष झाली आहेत. आजही आपण आपल्या संविधानाचा आदर करत आहोत. घटनेच्या आदेशाने आपण पुढे जात आहोत. पण कुणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशाराच अजितदादांनी दिला आहे.

तुम्हाला नोंदी दिसत नाहीये का?

मनोज जरांगे पाटील यांनीही अजित पवार यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. आम्ही आरक्षण घेऊनच परत येऊ. अजित पवार यांना सापडलेल्या नोंदी माहीत नाहीत का? राज्यभरात 54 लाख नोंदी सापडलेल्या असताना संविधानाच्या चौकटीतच आरक्षण मिळेल असे असताना ते विरोधात का बोलत आहात?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तू पाप धुण्यासाठी इकडे आलाय. तुझ्या गावात मराठे तुझा सुफडा साफ करतील. तू इथून पुढे बोलला तर उद्यापासून तुला सोडणार नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना दिला आहे.

मान आणि शान वाढवण्याचं काम

मान आणि शान वाढविण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखाली झाले आहे. भारत देश प्रत्येक क्षेत्रात आगेकूच करत आहे. तरुण – तरुणींच्या हाताला काम कसे मिळेल असा प्रयत्न सुरु आहे. 80 कोटी जनतेला मोफत धान्य दिले जात आहे. घरकुल योजना राबवली जात आहे. काहींना नोकरी व काहींना व्यवसाय दिला जात आहे. शेतकऱ्यांना सहा हजार केंद्र व राज्यसरकार सहा हजार असे 12 हजार रुपये देत आहोत हेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.