अजित पवार यांना पाकिस्तानात पाठवा; भाजपच्या नेत्याच्या मागणीने खळबळ

| Updated on: Jan 02, 2023 | 8:15 AM

महाराष्ट्रातील एक नेते अजित पवार हे संभाजी महाराजांना धर्मवीर मानायला तयार नाहीत. त्यामुळे खरंच यांची रवानगी पाकिस्तानात केली पाहिजे. मी निषेध करणार नाही.

अजित पवार यांना पाकिस्तानात पाठवा; भाजपच्या नेत्याच्या मागणीने खळबळ
अजित पवार यांना पाकिस्तानात पाठवा; भाजपच्या नेत्याच्या मागणीने खळबळ
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कल्याण: छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. त्यांना स्वराज्य रक्षक म्हणा. धर्मवीर म्हणू नका, असं आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं. अजितदादांच्या या विधावरून भाजपने त्यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपने हा मुद्दा हाताशी घेऊन आता अजित पवार यांच्या विरोधात जोरदार हल्ला सुरू केला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तर अजित पवार यांना भारतात राहण्याचा अधिकारच नसल्याचं सांगत त्यांना पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादी आता या मुद्द्यावरून भाजपला काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नरेंद्र पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना अजित पवार यांच्यावर नाव घेऊन थेट हल्ला चढवला आहे. अजितदादांनी जे विधान केलं त्याबद्दल खरंतर त्यांना हिंदुस्थानातून हाकलून दिलं पाहिजे. पाकिस्तानमध्ये त्यांची रवानगी केली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्या नेत्याला माहीत नाही ते महाराष्ट्राचं दुर्देव आहे, अशी टीका नरेंद्र पवार यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

संभाजी महाराज यांनी शेवटच्या श्वासापर्यंत धर्म बदलला नाही. औरंगजेबाने त्यांचे हाल केले, त्यांनी धर्मांतर करावे म्हणूनच हाल केले. पण संभाजी महाराजांना धर्माचा अभिमान होता. त्यांनी धर्मासाठी प्राणांची आहुती दिली.

धर्माकरीता त्यांना वेदना सहन कराव्या लागल्या. म्हणूनच त्यांना जगात धर्मवीर म्हणून मान्यता आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशी महाराजांची जगात ओळख आहे, असं नरेंद्र पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील एक नेते अजित पवार हे संभाजी महाराजांना धर्मवीर मानायला तयार नाहीत. त्यामुळे खरंच यांची रवानगी पाकिस्तानात केली पाहिजे. मी निषेध करणार नाही. मागणी करेल. ज्यांना शिवाजी महाराज माहीत नाही.

ज्यांना संभाजी महाराज माहीत नाही, ज्यांना संभाजी महाराज धर्मवीर होते हे माहीत नाही, त्यांना या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपच्या हल्ल्याला राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही शब्दांशी खेळत बसू नका. त्यामागची भावना समजून घ्या, असं सांगतानाच राज्यपालांनी आणि भाजपच्या प्रवक्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. तेव्हा तुम्ही शांत का होता? असा सवालच रोहित पवार यांनी केला आहे.