
कल्याण: कल्याण ग्रामीणमधील 27 गावात घरांचे रजिस्ट्रेशन बंद आहे. असे असतानाही घरांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी बेकायदेशीरपणे बिल्डर आणि घर खरेदी करणाऱ्यांना टोकन दिले जात आहे. टोकनच्या नावाखाली लाखो रुपये उकळले जात आहेत, असा आरोप एका सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या टोकन घोटाळ्यात कल्याणमधील काही राजकीय नेते आणि अधिकारी गुंतल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र अधिकाऱ्यांनी या आरोपांना फेटाळून लावले आहे. त्यामुळे टोकन घोटाळा नक्की कोण करतंय? असा सवाल केला जात असून या घोटाळ्याची कल्याण-डोंबिवलीत जोरदार चर्चा रंगली आहे.
कल्याण ग्रामीणमधील 27 गावे नेहमीच चर्चेत आहेत. ही गावे महापालिकेतून वगळण्यात आली होती. 2015मध्ये ही गावे पुन्हा महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली. आता पुन्हा 27 पैकी 18 गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. 27 गावात मोठ्या प्रमाणत बेकायदा बांधकामे झाली आहेत. या बांधकामात घर घेणाऱ्या सर्वमान्यांची फसवणूक झाली आहे. घरांचे रजिस्ट्रेशन बंद असतानाही अनेकांनी या परिसरात घरे खरेदी केली आहे. मात्र, रजिस्ट्रेशन होत नसल्याने गृहखरेदीदारांची चांगलीच कुचंबना झाली आहे.
रजिस्ट्रेशन होत नसल्याने बिल्डर लॉबीला सुद्धा याचा फटका बसला आहे. या सर्व गोष्टीचा फायदा काही लोकांनी घेतला असल्याची बाब समोर आली आहे. कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते नरसिंग गायसमुद्रे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केला आहे. काही राजकीय मंडळी आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बिल्डर आणि घर खरेदी करणाऱ्यांना घर रजिस्ट्रेशनसाठी टोकन दिले जात आहे. एका टोकनची किंमत 70 हजार ते 2 लाख रुपयांर्पयत आहे. जो हे टोकन घेईल त्याचे रजिस्ट्रेशन केले जाईल. त्यापैकी 40 टोकन दिले गेल्याची बाब समोर आली आहे. ही संख्या अधिक असू शकते, असा दावा गायसमुद्रे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रजिस्ट्रेशनच्या अनुषंगाने करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. कार्यालयाच्या बाहेर कोण काय करतो याच्याशी आमचा काही संबंध नाही. आमच्या कार्यालयात जे रजिस्ट्रेशन होत आहे. त्याच्याशी आमचा संबंध आहे. भोगवाटा प्रमाणपत्र, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आणि रेरा प्रमाणपत्र पाहून रजिस्ट्रेशन केले जात आहे. टोकनची ऐकीव चर्चा आहे. मात्र त्याच्याशी आमचा काही एक संबंध नाही, असं कल्याण पूर्व भागातील रजिस्ट्रेशन कार्यालयातील सह दुय्यम निबंधक सुहास जाधव यांनी स्पष्ट केलं.
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 11 November 2021https://t.co/nqX0yISshH | #UddhavThackeray | #SanjayRaut | #ST | #Mumbai | #pune |
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 11, 2021
संबंधित बातम्या:
दागिने घ्यायच्या म्हणून आल्या, सोन्याच्या 90 नथी घेऊन पळाल्या, चोरीचा CCTV व्हिडीओ पाहाच
ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरावस्थेला महापालिकेस जबाबदार धरीत मनसे आमदाराची जोरदार टीका
ठाण्यातील मनोरुग्ण कुटुंबियांच्या भेटीसाठी आसुसले; मात्र नातेवाईकांची रुग्णांकडे पाठ