ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, गर्दीतून होणार सुटका, रेल्वे प्रवासाचे चित्र बदलणार; नवीन प्रोजेक्ट काय?
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक उभारले जाणार आहे. २५६ कोटी रुपयांच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा आढावा आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या.

मुंबईच्या रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि ठाणे-मुलुंड स्थानकांवरील वाढता ताण लक्षात घेता या दोन्ही स्थानकांदरम्यान एक नवीन स्थानक उभारले जाणार आहे. या नव्या रेल्वे स्थानकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या महत्त्वाकांक्षी आराखड्यात समाविष्ट असलेल्या या प्रकल्पासाठी रेल्वे बोर्डाने २५६ कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला औपचारिक मंजुरी दिली आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे आणि मुलुंडदरम्यान एक स्थानक असावं, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. मात्र त्याला रेल्वे प्रशासनाकडून हवी तशी सहमती मिळत नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प कागदावरच रखडला होता. मात्र स्थानिक प्रवाशांची होणारी ओढाताण थांबवण्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी सक्रिय पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षी त्यांनी थेट रेल्वेमंत्र्यांची भेट घेत या प्रकल्पाचे गांभीर्य स्पष्ट केले. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक पाठबळाची विनंती केली होती. या पाठपुराव्यामुळेच रेल्वे बोर्डाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय?
ठाण्यातील मनोरुग्णालयाच्या परिसरात साकारले जाणारे हे स्थानक अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असणार आहे. ठाणे ते मुलुंडदरम्यान असणारे हे स्थानक एकूण १४.८३ एकर जागेवर विस्तारलेले असेल. यातील ३.७७ एकर जागेवर मुख्य रेल्वे रुळ आणि तळ मजल्यासह दोन मजली भव्य इमारत उभारली जाणार आहे. त्यासोबतच स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण तीन प्लॅटफॉर्म असतील, ज्यापैकी एक विशेष होम प्लॅटफॉर्म असेल.
यासोबतच या स्थानकाच्या इमारतीसमोर १५० मीटर लांब आणि ३४ मीटर रुंद असा सॅटिस डेक (SATIS) बांधण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. तसेच वाढती वाहनांची संख्या लक्षात घेऊन २.५ एकर जागेवर स्वतंत्र पार्किंगची सोय केली जाणार आहे. या ठिकाणी २५० चारचाकी आणि दुचाकी गाड्या उभ्या करता येतील.
या नव्या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली आहे. येत्या काही वर्षांत हे स्थानक पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. सर्व काही नियोजनानुसार पार पडल्यास येत्या २०२९ पर्यंत हे नवीन स्थानक ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्थानकामुळे केवळ ठाणे आणि मुलुंड स्थानकांवरील गर्दी कमी होणार आहे. तसेच परिसरातील दळणवळण व्यवस्थेला एक नवी गती मिळेल. ठाणेकरांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी असून या प्रकल्पामुळे उपनगरीय रेल्वे प्रवासाचा दर्जा उंचावण्यास निश्चितच मदत होईल.