’इट स्मार्ट सिटीज’ चॅलेंजमध्ये ठाण्याचा देशातील पहिल्या 20 शहरात समावेश

| Updated on: Dec 14, 2021 | 6:18 PM

स्मार्ट सिटीज मिशन आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या इट स्मार्ट सिटीज चॅलेंजमध्ये ठाणे शहराचा समावेश झाला आहे.

’इट स्मार्ट सिटीज’ चॅलेंजमध्ये ठाण्याचा देशातील पहिल्या 20 शहरात समावेश
ठाणे महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपला
Follow us on

ठाणे: स्मार्ट सिटीज मिशन आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या इट स्मार्ट सिटीज चॅलेंजमध्ये ठाणे शहराचा समावेश झाला आहे. देशातील पहिल्या 20 शहरांच्या यादीत ठाण्याचा समावेश झाला असून महाराष्ट्रातून निवड झालेली एकमेव महापालिका ठरली आहे.

15 एप्रिल रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेत देशातील सर्व 100 स्मार्ट शहरांसह एकूण 109 शहरांनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठी निवडलेल्या शहरांना मिलान अर्बन फूड पॉलिसी पॅक्ट, फूड फाऊंडेशन यासह इतर आंतरराष्ट्रीय तज्ञांसमोर सादरीकरण करावे लागणार आहे. 14 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत या शहरांना आपले सादरीकरण करावे लागणार आहे. यासोबतच शहराला खाद्यपदार्थाबाबत जागरूक आणि संवेदनशील बनवण्यासाठी पुढील तीन वर्षांची रणनीती आखण्यात येणार आहे. स्कोअरकार्ड, व्हिजन फॉर्म आणि सादरीकरणात मिळालेल्या गुणांच्या आधारे टॉप 11 शहरांची निवड करण्यात येणार आहे.

या शहरांचा समावेश

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड आणि अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासन यांनी संयुक्तपणे काम केले. अन्न परवाना, खाद्यपदार्थ नोंदणी, इट राइट कॅम्पस, इट स्मार्ट स्कूल, स्वच्छता रेटिंग, अन्न भेसळीची ऑन स्पॉट तपासणी या आव्हानांसाठी विहित केलेल्या कामांवर व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. प्राथमिक निवड चाचणीत ठाणे, आग्रा, अजमेर, भोपाळ, बेंगलोर, चंदीगड, इंदोर, जबलपूर, पणजी, पटना, राजकोट, सागर, शिमला, सुरत, तुमाकुरू, तिरुनेलवेली, बडोदा, उज्जैन, जम्मू आणि रौरकेला आदी शहरांची निवड करण्यात आली आहे.

ठाणेकरांचे आरोग्यही स्मार्ट हवं

दरम्यान, दुसऱ्या एका कार्यक्रमात बोलताना महापौर नरेश म्हस्के यांनी स्मार्ट सिटी ठाण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. ठाणे शहरातील नागरिकांना अत्यावश्यक पायाभूत स्मार्ट सुविधा देण्यासोबत त्यांचे आरोग्यही स्मार्ट राहिले पाहिजे यासाठी ठाणे महापालिका स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कटिबद्ध असल्याचा विश्वास महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी व्यक्त केला. एफएसएसएआय यांच्या सहकार्याने अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व स्मार्ट सिटी लि. यांच्यावतीने शहरातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘इट राईट स्कूल” कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

शहराचा विकास करताना नागरिकांना फक्त पायाभूत सुविधा न देता त्यांचा आरोग्य चांगले राहण्यासाठी महापालिका प्रयत्ननशील आहे. स्मार्ट शहरासोबत इथे स्मार्ट नागरिक तसेच स्मार्ट मुले राहतात यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. केंद्र शासनाच्या सुरक्षित खाणं, शाश्वत खाणे या स्पर्धेत देशामध्ये पहिल्या 20 मध्ये ठाणे महापालिकेनं स्थान मिळविले आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. बदलत्या काळानुसार सध्या सकस आहार घेणे महत्वाचे आहे. शिक्षकांनी लहान मुलांना सकस आहार खाण्याच्या दृष्टीने चांगल्या सवयी लावल्या तर या मुलांच्या माध्यमातून त्या संपूर्ण कुटूंबापर्यंत सहज पोहचल्या जातील. पर्यायाने संपूर्ण देशात होणाऱ्या या स्पर्धेत महापालिका नक्कीच यश संपादन करेल असा विश्वास महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी व्यक्त केला.

 

संबंधित बातम्या:

St worker strike : कामावर हजर न राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ प्रक्रियेला सुरुवात-सूत्र

Obc reservation : ओबीसी समाजाची 17 डिसेंबरला चक्काजाम आंदोलनाची हाक, या मागण्यांसाठी उतरणार रस्त्यावर

कोरेगाव भीमाच्या विकासासाठी 100 कोटी, शौर्य दिनाचा कार्यक्रम राज्य सरकार पार पाडणार; धनंजय मुंडेंची मोठी घोषणा