मुसळधार पावसाने ठाण्यात इमारतीची भिंत कोसळली, पाच गाड्यांसह दुचाकींचेही नुकसान

| Updated on: Jul 19, 2021 | 7:41 AM

रविवारी रात्रीच्या सुमारास ठाण्यातील कॉसमॉस इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंतीचा ढिगारा पडून 5 चारचाकी आणि 5 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसाने ठाण्यात इमारतीची भिंत कोसळली, पाच गाड्यांसह दुचाकींचेही नुकसान
ठाण्यात कॉसमॉस इमारतीची संरक्षक भिंत कोसळली
Follow us on

ठाणे : मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबुर आणि विक्रोळी भागात घडलेल्या दुर्घटना ताज्या असतानाच ठाण्यातही भिंत कोसळली. कॉसमॉस इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पाच कार आणि पाच दुचाकींचं नुकसान झालं. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली.

नेमकं काय घडलं?

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा मुल्ला भागातील कॉसमॉस इमातीत ही दुर्घटना घडली. रविवारी रात्रीच्या सुमारास इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंतीचा ढिगारा पडून 5 चारचाकी आणि 5 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाच्या पथकासह जेसीबी दाखल झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चेंबुर-विक्रोळीत मोठ्या दुर्घटना

याआधी, मुंबईतील चेंबुर आणि विक्रोळी या भागात पावसामुळे शनिवारी रात्री दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याने 21 जणांना प्राण गमवावे लागले, आणि दोघे जखमी झाले. तर विक्रोळीत घरांवर दरड कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला.  शक्यता आहे.

अंबरनाथमध्ये शिवमंदिराचा पूल पाण्याखाली

दुसरीकडे, अंबरनाथ शहर आणि परिसरात रविवारी सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीचा प्रवाह प्रचंड वाढला. त्यामुळे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा पूल पाण्याखाली गेला होता.

अंबरनाथजवळच्या डोंगरातून उगम पावणाऱ्या वालधुनी नदीला रविवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मोठा प्रवाह आला होता. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसरात तर या नदीने अक्षरशः रौद्ररुप धारण केलं होतं. नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे वालधुनी नदीवर असलेला शिव मंदिरात जाणारा पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे शिवमंदिरात जाणारा रस्ता काही काळासाठी बंद झाला.

इंद्रायणी नदी पात्रात युवक बुडाला

दरम्यान, पर्यटनबंदीचा आदेश झुगारून पर्यटनासाठी आलेला 21 वर्षीय तरुण इंद्रायणी नदी पात्रात बुडाल्याची घटना समोर आली.
करन हंबीर असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. करन आणि त्याचे मित्र रविवारी पुण्यातील येरवडा येथून मावळमधील कुंडमळा येथे वर्षा विहारासाठी गेले होते. त्यावेळी तो नदीपात्रात बुडाला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला. कलम 144 चा आदेश भंग करुन मोठ्या प्रमाणात पर्यटक कुंडमळा येथे गेल्याचं दिसलं.

रत्नागिरीत दोघांचा बुडून मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथे दोन तरुणांचा बूडून मृत्यू झाला. गायमुख पऱ्याजवळ पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांचा मृत्यू झाला, तर सुदैवाने चौघे जण बचावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

संबंधित बातम्या :

Mumbai Rain | कुठे भिंत कोसळली, तर कुठे दरड कोसळली, मुंबईत तीन दुर्घटना

वसई विरारमध्ये रात्रभर मुसळधार, रस्ते जलमय, जाधव पाड्यात 80 रहिवाशांची सुटका

(Thane Cosmos Building Compound wall collapse five cars and five two wheelers damaged)