सीमाप्रश्नाचं लोण ठाण्यातही, ठाणे महापालिका हद्दीतून दिव्याला वगळा; दिवेकरांची ‘या’ महापालिकेत जाण्याची मागणी

| Updated on: Dec 09, 2022 | 10:12 AM

महापालिकेने काही स्थानिकांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. मात्र आम्ही ठेवलेला विश्वास म्हणजे आमचा विश्वासघातच ठरला.

सीमाप्रश्नाचं लोण ठाण्यातही, ठाणे महापालिका हद्दीतून दिव्याला वगळा; दिवेकरांची या महापालिकेत जाण्याची मागणी
सीमाप्रश्नाचं लोण ठाण्यातही, ठाणे महापालिका हद्दीतून दिव्याला वगळा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे: महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता ठाणे जिल्ह्यातही नवा सीमावाद निर्माण झाला आहे. दिव्यातील नागरिकांनीही ठाणे जिल्ह्यात राहण्यास नकार दिला आहे. आम्हाला ठाणे महापालिकेकडून कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हाला ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतून वगळण्यात यावे, अशी मागणी दिवेकरांनी केली आहे. आमचा ठाण्याऐवजी नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी दिवेकरांनी केली आहे.

दिवा परिसर गेली अनेक वर्ष ठाणे महापालिका क्षेत्रात आहे. मात्र, अनेक मूलभूत सुविधांपासून आम्ही वंचित आहोत, असा दावा जागा हो दिवेकर या संस्थेने केला आहे. तसेच ठाणे महापालिका हद्दीतून दिवा परिसराला वगळण्याची मागणीही केली आहे.

हे सुद्धा वाचा

दिवा परिसर नवी मुंबईला जोडण्यात यावा, अशी मागणी जागा हो दिवेकर या संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी केली आहे. भोईर यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. त्यामुळे भविष्यात दिवा सीमा वादाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका स्थापन होऊन जवळपास 40 वर्षे झाली आहेत. दातिवली, बेतवडे, साबे, आगासन, म्हातार्डी, देसाई, पडले, खिडकाली शीळ, खार्डी असा बराचसा खाडीकिनारी परिसर ठाणे महापालिकेने आश्वासने देऊन आपल्यात समाविष्ट करून घेतला.

महापालिकेने काही स्थानिकांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. मात्र आम्ही ठेवलेला विश्वास म्हणजे आमचा विश्वासघातच ठरला. ठाणे महापालिकेने आम्हाला कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविल्या नाहीत, असा आरोप संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी पत्रात केला आहे.

दरम्यान, ठाणे महापालिकेचे पालिका आयुक्त बांगर यांनी या पत्रावर अद्याप उत्तर दिलं नाही. तसेच या पत्रासंदर्भात त्यांनी मीडियाला कोणताही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.