‘त्यांना जितकं पळायचंय तितकं पळू द्या’, ओमी कलानी यांचं थेट भाजपला आव्हान, उल्हासनगरच्या राजकीय घडामोडींना वेग

| Updated on: Jun 21, 2021 | 9:29 PM

उल्हासनगर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजपच्या (टीम ओमी कलानीच्या) सात नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं होतं (Omi Kalani challenge to BJP).

त्यांना जितकं पळायचंय तितकं पळू द्या, ओमी कलानी यांचं थेट भाजपला आव्हान, उल्हासनगरच्या राजकीय घडामोडींना वेग
टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी पप्पू कलानी
Follow us on

उल्हासनगर (ठाणे) : उल्हासनगर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजपच्या (टीम ओमी कलानीच्या) सात नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं होतं. त्यामुळे भाजपला सर्व समित्या गमवाव्या लागल्या होत्या. यानंतर आता या नगरसेवकांचं पद रद्द करण्याची मागणी उल्हासनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी यांनी केली आहे. तर त्यांना जितकं पळायचं आहे तितकं पळू द्या, असं म्हणत टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी पप्पू कलानी यांनी भाजपला आव्हान दिलंय (Omi Kalani challenge to BJP).

नेमकं प्रकरण काय?

उल्हासनगर महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत टीम ओमी कलानीने आपले उमेदवार भाजपच्या चिन्हावर उभे करत निवडून आणले होते. या मोबदल्यात सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या महापौरपदाच्या कार्यकाळात सव्वा वर्ष भाजप, तर सव्वा वर्ष टीम ओमी कलानीला महापौरपद देण्यात आलं होतं. तर दुसरीकडे जीवन इदनानी यांचा साई पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत राज्यात सत्तांतर झाल्याचा प्रभाव जाणवला (Omi Kalani challenge to BJP).

टीम ओमी कलानीच्या 9 नगरसेवकांचं महाविकास आघाडीला मतदान

टीम ओमी कलानीच्या 9 नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान करत शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांना महापौर म्हणून निवडून आणलं. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. हे नगरसेवक टीम ओमी कलानीचे असले, तरी ते भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले असल्यानं तांत्रिकदृष्ट्या ते भाजपचे होते. त्यामुळे त्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करत भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी यांनी याचिका दाखल केली.

भाजपच्या जिल्हाध्यक्षांची कोकण आयुक्तांकडे तक्रार

त्यानंतर आता पुन्हा प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत टीम ओमी कलानी आणि साई पक्षाच्या एकूण 7 नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान केल्याने भाजपला सर्व प्रभाग समित्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे स्थायी समिती आली असली, तरी प्रभाग समित्या मात्र गेल्यानं सिंह आला, पण गडच गेला, अशी भाजपची अवस्था झाली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रभाग समितीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या त्या 7 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी यांनी कोकण आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी पप्पू कलानी यांना विचारलं असता, आम्ही याआधीही त्याची पर्वा केली नव्हती आणि आताही करत नाही. त्यांना जितकं पळायचं आहे पळू द्या, असं म्हणत कलानी यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींमुळे उल्हासनगरातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा समोर आला असून राज्यात सत्तांतर झालं की स्थानिक पातळीवर गणितं कशी बदलतात, हेदेखील पाहायला मिळतंय.

संबंधित बातम्या :

उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि टीम ओमी कलानीत राडा, आमदार रविंद्र चव्हाणांच्या समोरच गदारोळ