
ठाणे : भातसा धरण (Bhatsa Dam) क्षेत्रात वाढलेल्या पावसामुळे धरणातील संभाव्य येवा वाढला आहे. त्यामुळे उद्या, दिनांक 20 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता धरणाचे पाच वक्रद्वार उघडून सुमारे 6215.44 क्युसेक पाण्याचा विसर्ग (Water Discharge) सोडण्यात येणार आहे. त्यामुळे भातसा नदी किनाऱ्यावरील विशेषतः शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदी काठावरील इतर गावांना सतर्कते (Alert)चा इशारा प्रशासनाने दिला आहे. भातसा धरणात आज दुपारी 12.30 वाजेपर्यंत 138.10 मीटर एवढी पाणी पातळी होती. धरणातील पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे या काळात नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीच्या पाण्यात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व लाभ क्षेत्रात वाढत्या पावसामुळे आणखी संभाव्य येवा वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियमित करण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता धरणाची 1 ते 5 क्रमांकाची वक्रद्वारे उघडण्यात येणार आहेत. यातून धरणातील 6215.44 क्युसेक पाणी सोडण्यात येणार असल्याचे भातसा नगर येथील पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी कळविले आहे. त्यामुळे भातसा नदीच्या किनाऱ्यावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व इतर गावांमध्ये प्रशासनाने सतर्क राहण्याची सूचना केली आहे.
धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा, भातसा, मिडल वैतरणा, मोडक सागर या चार ही धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असून धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळेच भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. (Water will be released from Bhatsa Dam tomorrow morning, alert to citizens)