मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? शेवटी एकदाचं ठरलं, शरद पवारांच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय
गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमधून मोठी बातमी समोर आली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली होती. स्वत: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील त्यावेळी मोठा गौप्यस्फोट केला होता. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. दरम्यान अजूनही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरूच आहे. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती, या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे देखील उपस्थित होते.
समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात चर्चा झाली, पक्षाने विलिनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या बैठकीला उपस्थित असलेलेले नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. यावर बोलताना अखेर पक्षातील वरिष्ठांनी विलिनीकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही, असं सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडून या बैठकीक स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पडदा पडला आहे.
या बैठकीला शरद पवार हे देखील उपस्थित होते, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दोन्ही राष्ट्रवादीचं आता विलिनीकरण होणार नाही, अशी भूमिका सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी मांडली तेव्हा शरद पवारांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र शरद पवार यांच्या समक्षच विलिनीकरणावर भूमिका मांडण्यात आल्यानं ते देखील या भूमिकेशी सहमत आहेत, अशी आता चर्चा सुरू झाली आहे. परंतु शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करायला हवी होती, अशी अपेक्षा या बैठकीला उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान या बैठकीवर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. पक्ष संघटना मजबूत करून मोठ्या उमेदीने काम करायचं आहे, असा निर्णय या बैठकीत झाला आहे. सक्षम विरोधी पक्ष आम्ही उभा करणार आहोत. विलीनीकरण विषय संपला आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.