ठाकरे गेम फिरवणार? राजकारणात मोठ्या उलथा पालथीची शक्यता, बंडखोर खासदारांची धाकधूक वाढली, काऊंटडाऊन सुरू
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली, 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली, मात्र आता एक मोठी बातमी समोर आली असून, या खासदारांची धाकधूक वाढली आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदारांच्या बंडापूर्वीच ममता बॅनर्जी यांना देखील असाच धक्का बसला होता. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव होताच, तब्बल वीस खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, या सर्व खासदारांनी नव्या पक्षात प्रवेश केला. दरम्यान आता 20 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनापूर्वीच राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला पुढील काही दिवसांमध्ये एक ऐतिहासिक निकाल देणार आहेत. हा निकाल तृणमूल काँग्रेसचे 20 बंडखोर खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे 6 बंडखोर खासदार अशा 26 खासदारांसंदर्भात असणार आहे. पक्षात बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती, त्यांनी या सर्व बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.
दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये आता ओम बिर्ला या खासदारांसंदर्भात आपला निर्णय सुनावणार आहेत. आता ओम बिर्ला काय निर्णय देतात यावर उद्धव ठाकरे यांच्या पुढच्या राजकारणाची दिशा अवलंबून असणार आहे. ज्या खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली, त्यांनी केलेल्या दाव्यानुसार शिवसेना ठाकरे गटाकडे एकूण 9 खासदार होते, त्यातील 6 खासदारांनी एकाचवेळी बंड केल्यामुळे खासदारांची ही संख्या दोन तृतियांश झाल्याने त्यांचा पक्षप्रवेश वैध आहे. परंतु शिवसेना ठाकरे गटाने केलेल्या दाव्यानुसार जर तुम्हाला एखाद्या पक्षात विलीन व्हायचं असेल तर तसा निर्णय पक्षाने घ्यावा लागतो, आणि त्याला दोन तृतियांश खासदारांचं समर्थन लागतं, असा नियम आहे. मात्र इथे असं घडलेलं नाहीये, पक्ष जागेवरच आहे, फक्त खासदारांनीच बंड केलं आहे, त्यामुळे त्या खासदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.
संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार पक्षांतरबंदी कायद्यानुसार अध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च असतो. त्यामुळे या प्रकरणात आता लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना अंतिम निर्णय घ्यायचा आहे. ओम बिरला काय निर्णय घेणार? यावरच या दोन्ही पक्षाचं भवितव्य काय असणार? हे ठरणार आहे. जर लोकसभा अध्यक्षांनी शिवसेना ठाकरे गटाने केलेला दावा ग्राह्य धरल्यास या बंडखोर खासदारांना मोठा झटका बसू शकतो. ओम बिर्ला काय निर्णय घेणार? खासदार पात्र ठरणार की अपात्र? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.