
राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्या सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. अजितदादांच्या निधनानंतर तीन दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. सुनेत्रा पवार यांनी आधी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर आणि चैत्यभूमीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्या आज दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे.या सर्व घाडमोडी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयीचे संकेत देत आहेत. लवकरच दोन्ही पक्षाचं विलीनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान सुनेत्रा पवार यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली. “ज्या खुर्चीत बसून अजितदादा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचे, त्याच खुर्चीत आज मा. सुनेत्राकाकींना पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुखः अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय. या खुर्चीत आज अजितदादा नाहीत याचं अतीव दुःख आहे पण सुनेत्राकाकी आहेत याचा आनंदही आहे” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
त्यामुळं तीही त्या पूर्ण करतील
“अजितदादांची उणीव कदापि भरुन काढता येणार नाही पण सुनेत्राकाकी या अजितदादांच्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करताना राज्यभरातील सामान्य माणूस आणि त्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम करतील, याचा पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा! तसंच उपमुख्यमंत्री पदासह त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकरच विराजमान व्हावं, ही काही नेत्यांची इच्छा नसली तरी राज्यभरातील लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, त्यामुळं तीही त्या पूर्ण करतील, असा विश्वास आहे” असं रोहित पवार म्हणाले.
त्यांना काही गोष्टींची कल्पना आहे
पुण्यासह बीडचे पालकमंत्री पदही सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात आलं आहे. अजितदादांचा कामाचा जो धडाका होता, त्याचा विचार करता पदाला न्याय देण्यासह पक्ष सांभाळण्याची मोठी जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री बनण्याआधी राज्यसभेवर खासदार होत्या. राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना काही गोष्टींची कल्पना आहे.