
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरातचे काळे कारनामे एकामागून एक समोर येत आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यासोबत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अशोक खरातला पोलीस यंत्रणेकडून पाठीशी घातल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गेल्यावर्षीच कारवाई झाली असती, पण हे प्रकरण दाबलं गेलं. त्यामुळेच आयजी दत्तात्रय कराळे यांनीही अशोक खरातला वारंवार पाठीशी घातलं त्यामुळे त्याची हिंमत वाढत गेली. त्यानंतरही त्याने महिलांवर लैंगिक शोषण सुरु ठेवले. त्यासाठीही आयजी दत्तात्रय कराळेही जबाबदार असून त्यांचीही चौकशी होणं गरजेचे आहे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातलं आहे, तर याला अध्यक्ष स्वत: जबाबदार आहेत. जेव्हा ही बातमी आली तेव्हा त्या पत्रकारावर दबाव आणणं, धमकी देणं, त्याला नोटीसा पाठवणं हे प्रकार सुरु झाले. ही बातमी पीडितेवर अन्याय झाला होता म्हणून आली होती. पीडितेसाठी त्यांनी कोणताही फोन केला नाही. त्यामुळे या गोष्टीसाठी रुपाली चाकणकर, महिला आयोग जबाबदार आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर यांचीही चौकशी होणं तितकंच गरजेचे आहे, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले.
आता एसआयटी तेजस्वी सातपुतेंकडे हा तपास आहे. त्यांनी रुपाली चाकणकर जे कोणी यात दोषी आहेत, त्यांचा तपास करावा, तसेच त्या अनुषंगाने त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करावं, मग ते दोषी असतील की नाही, हे पोलीच ठरवतील. रुपाली चाकणकरांना खरातची दुसरी बाजू पूर्णपणे माहिती होती. म्हणजेच हा जो खरात आहे, हा लैंगिक शोषण कसा करतो, तो लिंगपिसाट कसा आहे, याची पूर्ण माहिती त्यांना गेल्यावर्षीच माहिती झाली होती, असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला.
त्यासंदर्भातच ते प्रकरण दाबण्यासाठी किंवा ते प्रकरण बाहेर येऊ नये, यासाठी त्यांनी दबाव आणला होता. त्यामुळे रुपाली चाकणकर खोटं बोलत आहेत. रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांना पाठीशी घातलं आहे. त्यांचे गुन्हे बाहेर येऊ नयेत यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे, त्यामुळे त्यांची चौकशी होणं गरजेचे आहे, अशीही मागणी तृप्ती देसाई यांनी केली.