तुकाराम मुंढेंना विचारलं, ‘सबुरीने का घेत नाही?’ उत्तर ऐकताच सभागृहात टाळ्या अन् शिट्ट्या
Tukaram Mundhe Interview : तुकाराम मुंढे यांनी पिंपरी चिंचवडमधील दिशा सोशल फांऊडेशनला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यातील एका प्रश्नाच्या उत्तरावर शिट्ट्या आणि टाळ्या पहायला मिळाल्या.

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे गेल्या काही महिन्यांपासून धडाकेबाज कारवाई करत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. छोट्या व्यापाऱ्यापासून बड्या कलाकारांपर्यंत सर्वांना तुकाराम मुंढे यांनी दणका दिला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जो चुकेल त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाते. अशातच तुकाराम मुंढे यांनी पिंपरी चिंचवडमधील दिशा सोशल फांऊडेशनला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यातील एका प्रश्नाच्या उत्तरावर शिट्ट्या आणि टाळ्या पहायला मिळाल्या. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तुकाराम मुंढेंच्या उत्तरावर टाळ्या अन् शिट्ट्या
आजच्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांना तुकाराम मुंढे सबुरीने का घेत नाहीत? का समजून घेत नाहीत? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना मुंढेंनी म्हटलं की, ‘मी काय समजून घेत नाही? सिस्टमचा पार्ट होऊन काम करावं, हे काय मला समजणारं नाही.’ तुकाराम मुंढे यांच्या या उत्तरानंतर उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या. तसेच पुढे बोलताना त्यांना सविस्तर या प्रश्नाचे उत्तर दिले.
सर्वचं अधिकारी काम करतात, फक्त…
तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, ‘कार्यशैलीत बदल करा, म्हणजे कोणत्या दोन गोष्टी बदलायला हव्या हे सांगा. मुळात नियम हे माध्यम आहे. नियम का असतो? त्या नियमाप्रमाणे केलं तर सगळं ठीक आहे. कारण त्यातच पब्लिक इंटरेस्ट आहे. मग म्हणतात की हा नियम पाळत नाही. तिथं पब्लिक इंटरेस्ट नसतो. सर्वचं अधिकारी काम करतात, फक्त सर्वांच्या पद्धती वेगळ्या असतात. म्हणजे मीचं खूप चांगलं काम करतोय, असं मी कधीचं म्हणत नाही.’
पुढे बोलताना तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, ‘मुळात तुम्ही काम करता, यापेक्षा मी काम का करत नाही? असा प्रश्न विचारला की सर्व उत्तरं मिळतात. त्यामुळं मी कधी कोणाची कोणाशी तुलना करत नाही. माझ्या आधी कोण होतं? त्याने काय केलं? त्यांच्या त्रुटी मी काढत बसत नाही. मला पुढं काय करायचं आहे, हाचं माझा विचार असतो. जे निर्णय घेतोय, त्यांचा अपेक्षित रिझल्ट येतोय का? नागरिकांचा त्यातून फायदा होतोय का? याचा विचार मी करतो.’
छत्रपती शिवाजी महाराज जन्मावेत ते दुसऱ्यांच्या घरात…
पुढे बोलताना तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज जन्मावेत ते दुसऱ्यांच्या घरात, अशीच अनेकांची भावना आहे. त्यामुळं किमान माणूस आहोत तर माणसासारखे वागायला हवेत. जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला हवी, असं वाटतं मात्र स्वतः ती जबाबदारी घ्यायची तयारी कोणाची नसते. आता कुटुंब प्रमुख घरातील प्रत्येकाला नियम सांगणार, पण स्वतः काही करणार नाही. अशावेळी कुटुंबातील इतर कोणी प्रमुखाचे तेचं आदर्श घेतो. त्यामुळं जबाबदारीचं दायित्व आपण घेणार आहोत की नाही? आपण ही चुकू शकतो, हे स्वीकारण्याची तयारी असायला हवी.’