खवड्या डोंगरावरून उडी मारायचीच नव्हती, पण कुणालला वडिलांनी आदल्या दिवशी… त्या वादामुळे सगळं उद्ध्वस्त!
Kunal Changude : कुणाल चांदगुडे या तरुणाने खवड्या डोंगरावर जाऊन टोकाचं पाऊल उचललं. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कुणाल चांदगुडे या तरुणाने खवड्या डोंगरावर जाऊन टोकाचं पाऊल उचललं. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका क्षणात अख्खं कुटंब उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आयफोन खरेदीच्या हट्टापायी ही घटना घडल्याचे समोर आले असले तरी या घटनेमागे वेगळेच कारण असल्याचे समोर आले आहे. कुणालला खवड्या डोंगरावरून उडी मारायचीच नव्हती अशी माहितीही आता समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कुणालला जीव द्यायचाच नव्हता, पण…
कुणालच्या मावस काकांनी दिलेल्या माहिचतीनुसार कुणालच्या आई-वडिलांमध्ये घरगुती कारणातून छोटा-मोठा वाद होत होता. आई-वडिलांनी भांडू नये, त्यांना भीती दाखवून वाद थांबवावा, या उद्देशाने कुणाल डोंगरावर गेला होता. कुणाला डोंगरावरून खाली उडी मारायचीच नव्हती असेही आता समोर आले आहे. मात्र वडिलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी तोल गेल्याने तो आणि त्याचे वडील दोघेही डोंगरावरून खाली कोसळले आणि त्यांचा अंत झाला. त्यानंतर कुणालच्या आईनेही डोंगरावरून खाली उडी मारून जीव दिला.
वडील कुणालवर रागावले होते…
कुणालच्या मावस काकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरात छोटे-मोठे वाद होते. कुणालला वाटायचं की वाद नको व्हायला. काही कारणामुळे वडील पण त्याच्यावर थोडे रागावले होते. वाद होऊ नये म्हणून भीती दाखवण्याच्या नादात हे झालं. त्याला पण असं करायचं नव्हतं, मात्र पकडण्याच्या नादात घटना घडली आणि त्या तिघांचा दुर्दैवी अंत झाला अशी माहिती आता समोर आली आहे.
खवड्या डोंगरावरून आतापर्यंत 13 जणांनी उडी मारून जीवन संपवलं आहे. तर या ठिकाणी एक खुनाची घटना झाल्याचंही समोर आलं आहे. गतवर्षी एकाने त्याच्या बहिणीला कड्यावरून ढकलून दिल्याची घटनाही घडली होती. मात्र, या घटना अधूनमधून होत असल्याने हा डोंगर फार चर्चेत नव्हता. पण काल चांदगुडे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खवड्या डोंगर चर्चेत आला आहे.
