
UBT And Shiv Sena Alliance: राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत 29 महापालिकांपैकी बहुसंख्य महापलिकांत भाजपा हा क्रमांक एक नंबरचा पक्ष ठरला आहे. आता राज्यभरात महापौरपदाच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे महानगरपालिकेची निवडणूक संपलेली असताना आता दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वातावरण तापले आहेत. जिल्हा परिषद जिंकण्यासाठी आतापासूनच युती आणि आघाड्यांच्या राजकारणाने वेग पकडला आहे. असे असतानाच आता खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूक जिंकण्यासाठी या एकत्रिकरणासाठी चर्चा चालू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी पुण्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर सोमवारी (19 जानेवारी) दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची धाराशीव येथे संयुक्त बैठक होणार होणार आहे. तशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आज (18 जानेवारी) 5 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या अनुषंगानेच धाराशिव येथे पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक बोलावली आहे. या बैठकीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यात येणार आहे. एकंदरीतच आमदार तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला एकटे पाडण्याच्या हालचाली सुरू केल्याचं चित्र धाराशीव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राज्यात शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. असे असतानाच आता धाराशीवमध्ये एकत्रिकरणाच्या प्रयोगाची चर्चा होत आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.