
राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ अशी घोषणा केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन एक विधान केले होते. शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यानंतर तुम्ही कर्ज फेडा ना? की सारखं माफ, सारखं फुकट, सारखं माफ, साहेबांनी एकदा कर्जमाफी दिली. आता आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो. त्यासाठी काही पैसे खर्च करावं लागतं ना? असे विधान अजित पवारांनी भर सभेत केले होते. आता यावरुन उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. सध्या उद्धव ठाकरे हे पैठण तालुक्यातील नांदर गावातील शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी केलेल्या विधानावर टीका केली. कर्जमाफी करण्याआधी माती तर द्या. मग कर्ज द्या. मी हा विषय सोडणार नाही. तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत राहणार. केंद्रीय पथक फिरतंय. तुमच्याकडे आलं का, येईल बहुतेक. रात्री टॉर्च घेऊन फिरणार. आता रिपोर्ट देईल. निवडणुकीनंतर दयावान सरकार गुळ लावणार, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
दिवाळीच्या आत पैसे देणार होते. दिवाळी झाली. तुळशीचं लग्न झालंय. पंचांग काढत आहेत. मुहूर्तमागे मुहूर्त काढत आहेत. पण मदतीच्या नावाने बोंबाबोंब सुरु आहे. आम्ही तुमच्यासोबत राहणार असे सांगत आहेत. पण आम्हाला जूनची मुदत मान्य नाही. कर्जमुक्ती करा. आताच्या आता करा. निवडणुकीसाठी कर्जमुक्ती केली आहे. खोटं बोलत आहेत. अजित पवार म्हणतात जिंकायचं म्हणून कर्जमुक्ती केली. अजित पवार बेधडक बोलत आहेत की जिंकायचं म्हणून कर्जमुक्ती केली. लोकांना तुम्ही हातपाय हलवायला सांगत आहात, मग तुम्ही काय हलवत आहात?” असा संतप्त सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. शेतकरी हाताश आहे. अडलेल्या शेतकऱ्यांना आता संकटातून काढलं नाही तर तो परत उभा राहणार नाही, असा भीती त्यांनी व्यक्त केली.
गेल्या आठवड्यात काही तरी होईल वाटलं होतं. सर्व एकजूट झाले होते. परत मुख्यमंत्र्यांनी गुळ लावला. कर्ज कसं फेडणार. पॅकेज ही थट्टा आहे. अर्धवट पॅकेज आहे. ते पॅकेजच नाहीये. पीक विम्याचे पैसे मिळाले नाही. कुणी पीक विमा भरला होता का. त्याची माहिती घेतली होती. ज्याने भरला त्याने सांगा, तुम्हाला नुकसानीची किती रक्कम मिळायला हवी होती, असे सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केले.