उद्धव ठाकरेंनी थेट PM मोदींवर तोफ डागली; म्हणाले, ‘माफ करण्याची गरज नव्हे, तर…’
Uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींनी माफ करण्याऐवजी त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री सोशल मीडियावर जेन-झीशी संवाद साधत शिवीगाळ करणाऱ्या आंदोलकांना माफ केलं. विद्यार्थी भरकटले असून त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटलं. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी करण्याची गरज नसून उलट त्यांनीच माफी मागितली पाहिजे. नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर तोफ डागली.
उद्धव ठाकरे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हटलं की, ‘ पंतप्रधानांनी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. आंदोलकांना काठीला खिळे लावून मारले. पॅलेट गनचा वापर करण्यात आला. पोलिसांनी तरुणींचे कपडे फाडले गेले. एक पोलीस अत्यंत लाजीरवाण्या पद्धतीने तरुणींवर लाठीमार करत होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नीट पेपरफुटीमुळे ज्यांनी आत्महत्या केली, त्यांची पंतप्रधान मोदींनी माफी मागितली पाहिजे. आंदोलक तरुणांची भाषा योग्य की अयोग्य? हा प्रश्न आहेच. परंतु ही भाषेची सुरुवात नमोरुग्णांनी केली…मनोरुग्ण तर आहेतच. मी त्यांना नमोरुग्ण म्हणतो. त्यांना हा दोष देईल. त्यांच्याकडून जसं ट्रोलिंग चालतं. एका रिया अहिर नावाच्या मुलीने पोलिसांची गाडी अडवली. तिला वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आलं. आपल्या देशात नेमकं काय सुरू आहे, याची माहिती पंतप्रधानांनी जवळच्या सहकाऱ्यांकडून घेतली पाहिजे. माफ करण्याची नाही, तर माफी मागण्याची गरज आहे’.
‘आधी तरुणांना झुरळ म्हटलं. आता भरकटलेले म्हणत आहेत. ही मुलं तुम्हाला माफ करतील का? ज्यांच्या मनावर वळ उठले आहेत. मी गेलो होतो, आंदोलकांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले होते. एक तरुणी उद्वेगातून पोलिसांनी कपडे फाडल्याचे सांगत होती. ऐकताना देखील अंगावर शहारे आले होते. ही परिस्थिती त्यांनी भोगली. साधी मागणी होती. आता जे करताय, ते पहिल्या दिवशी बोलून करता आली असती. अतिरेकी, पाकिस्तान्यांशी बोलायला काही वाटत नाही. देशाच्या भाग्यविधात्यांना भरकटलेले म्हणत आहेत. मग देश चालणार कसा? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
