शिवसेनेचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण, उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष… भाजपच्या बड्या नेत्याने डिवचलं

काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे, नाना पटोले यांनी प्रस्ताव आल्याचा दावा केला तर सुप्रिया सुळेंनी तो फेटाळला. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार आशिष देशमुख यांनी उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होतील आणि शरद पवार विरोधी पक्षनेते, असा खोचक टोला लगावला.

शिवसेनेचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण, उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष... भाजपच्या बड्या नेत्याने डिवचलं
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 13, 2026 | 2:02 PM

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सध्या बंद झाल्या असल्या तरी आता नव्या चर्चेला उधाण आलं आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी तर पवार गटाकडून तसा प्रस्ताव आला असून आता त्यावर प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. जाणकारांच्या मते, 15 ऑगस्टपर्यंत शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन झालेला असले. या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच भाजपचे नेते आणि आमदार आशिष देशमुख यांनी पवार गटासह उद्धव ठाकरे यांना चांगलंच डिवचलं आहे. आशिष देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेलं विधान सध्या चर्चेत आलं आहे.

शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करून शरद पवार यांना राज्यसभेत विरोधी पक्षनेते पद दिलं जाणार आहे. तर उबाठा गट काँग्रेसमध्ये विलिन करून उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बनवायची इच्छा बेगाने शादी मे अब्दुला दिवाना यांची (संजय राऊत) असू शकते. या अनुषंगाने संजय राऊत यांनी विलिनीकरणारव विधान केलं असेल, असा उपरोधिक टोला आशिष देशमुख यांनी लगावला आहे.

मरता क्या न करता…

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे खासदार महायुतीतील पक्षांमध्ये जाण्यासाठी आतुर आहेत. मरता या क्या न करता यापेक्षा यांना काँग्रेसमध्ये पाठवावं म्हणून शरद पवार यांना विरोधी पक्ष नेतेपद आणि उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष पद देणे हाच यामागचा उद्देश आहे, असा दावाच आशिष देशमुख यांनी केला आहे.

आम्हीच जिंकू

यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीवरही भाष्य केलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला नागपूर जिल्ह्यात एकहाथी सत्ता दिली. त्यामुळे 80 टक्क्यांपेक्षा अधिक मत घेऊन भाजपचे विधान परिषद उमेदवार डॉ राजीव पोतदार शंभर टक्के जिंकणार आहेत, असं ते म्हणाले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आम्ही काँग्रेसला दिलेला नसल्याचं म्हटलं आहे. याबाबतची कोणतीही माहिती मला आणि शरद पवार यांना नाही. तुमच्याकडूनच ही माहिती मिळत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा या हवेतील गप्पा आहेत का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

 

Follow Us