सचिन अहिर यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र… ठाकरे गटाच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, सत्तेचा वारा…
thackeay group on sachin ahir : सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडली. सचिन अहिर यांच्या शिंदे गट प्रवेशावर ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन अहिर यांची शिंदे गटात एन्ट्री झाल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसला. अहिर यांनी साथ सोडल्याने ठाकरे गटाचा वरळीचा बालेकिल्ला ढासळल्याची चर्चा आहे. वरळीत आदित्य ठाकरे यांच्यामागे राजकीय ताकद उभी करणाऱ्या सचिन अहिर यांनी शिंदे गटातून उपसभापतीपदाचा अर्ज भरला आहे. आठ दिवसांत खासदारांनंतर आमदारानेही साथ सोडल्याने उद्धव ठाकरे आणखी बॅकफुटवर गेले आहेत. सचिन अहिर यांच्या निर्णयावर आता ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सचिन अहिर यांच्या शिंदे गटात जाण्यास राजकीय स्थलांतर असल्याचे म्हणत ठाकरेंच्या नेत्याने टीका केली आहे.
महाराष्ट्रात ठाकरे गटाचे २० आमदार आहेत. तर विधानपरिषदेत ठाकरेंचे ६ आमदार आहेत. सचिन अहिर त्यापैकी एक होते. वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरे यांना सोडल्यानंतर सचिन अहिर यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली होती. मागील दोन टर्मपासून ते विधानपरिषदेतून आमदार आहेत. मागील काही दिवसांत ठाकरेंच्या खाद्यांला खांदा लावून फुटीर खासदारांवर टीका करणारे सचिन अहिर यांनी शिंदे गटात एन्ट्री केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाचा वरळीचा बालेकिल्ला देखील ढासळल्याचे बोलले जात आहे.
स्वतःचं राजकीय भविष्य शोधण्यासाठी बाहेर पडलेले वरळीचे ‘Political Migrant’…
तीन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार, मंत्री म्हणून सत्तेचा उपभोग घेतला. तिथे स्वतःचं भविष्य दिसेनासं झालं, तेव्हा शिवसेनेत प्रवेश करून आमदारकी मिळवली.
आता शिवसेना कठीण काळातून जात असल्याचं दिसताच…— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) June 30, 2026
सचिन अहिर यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सचिन अहिर यांचा खरपूस समाचार घेतला. अखिल चित्रे म्हणाले, ‘स्वतःचं राजकीय भविष्य शोधण्यासाठी बाहेर पडलेले वरळीचे ‘Political Migrant’…तीन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार, मंत्री म्हणून सत्तेचा उपभोग घेतला. तिथे स्वतःचं भविष्य दिसेनासं झालं, तेव्हा शिवसेनेत प्रवेश करून आमदारकी मिळवली. आता शिवसेना कठीण काळातून जात असल्याचं दिसताच पुन्हा एकदा शिंदेंच्या गटाचा मार्ग धरला. उपसभापतीपदाच्या आशेने सुरू असलेला हा सगळा खटाटोप म्हणजे पुढच्या राजकीय संधीच्या शोधात कायम राजकीय तीर्थयात्रेवर आणि सत्तेचं पुढचं केंद्र जिथे दिसेल तिकडेच राजकीय स्थलांतर’.