इकडे लपू की तिकडे लपू..? पावसाचा दणादण मारा… प्रचंड वारा सुटल्याने घराची पत्रेही उडाली; राज्यात अवकाळीने दाणादाण

Heavy Rain in Maharashtra : आज अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमधील नागरिकांची तारांबळ उडाली.

इकडे लपू की तिकडे लपू..? पावसाचा दणादण मारा... प्रचंड वारा सुटल्याने घराची पत्रेही उडाली; राज्यात अवकाळीने दाणादाण
Heavy Rain in Marathwada
Image Credit source: Google
| Updated on: May 25, 2026 | 6:54 PM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. आज अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले, त्यामुळे लोकांची दाणादाण उडाली. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चित्तेपिंपळगाव परिसरात आज अचानक विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी जोरदार हजेरी लावत मुसळधार पाऊस झाला. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे परिसरातील वातावरणात मोठा गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले होते. रविवारी दुपारी अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्यांमुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर रस्त्यांवरही पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी किंवा नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. सध्या शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. नांगरणी, वखरणी आणि पेरणीपूर्व तयारी सुरू असतानाच झालेला हा पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

घरावरील पत्रे उडाली

छत्रपती संभाजीनगर शहरासह वाळूज महानगर परिसरात सोमवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे व इतर साहित्य उडाल्याच्या घटना घडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून रस्त्यांवर धावपळ सुरू झाली. काही भागात झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. संभाजीनगरच्या इतरही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे पहायला मिळाले.

छत्रपती संभाजीनगरात वादळी वाऱ्यामुळे धुळीचे साम्राज्य

छत्रपती संभाजीनगर शहरात आज अचानक जोरदार वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली. या वादळी वाऱ्यांमुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ उडाल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः दुचाकीस्वारांचे संतुलन राखणे कठीण झाले होते. दरम्यान, आकाशात अचानक दाट ढग जमा झाल्याने दिवसा अंधार पडल्यासारखे वातावरण निर्माण झाले.

धाराशिवच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील मुरूम आणि दाळींब परिसरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. या पावसामुळे उन्हाच्या तीव्रतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, शेतकरी वर्गासाठी हा पाऊस समाधानकारक मानला जात असला, तरी जोरदार वाऱ्यामुळे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अकोला जिल्ह्यातही पावसाची हजेरी

अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यातील दहीहंडा येथे कडाक्याच्या उष्णतेनंतर आज पावसाची हजेरी पहायला मिळाली, यामुळे वाढत्या उकड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तापमानात मोठी वाढ होत आहे. अशातच आज अकोल्यातील ग्रामीण भागात जोराच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात मोठा बदल झाला आहे. या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.

अमरावती शहरात पावसाच्या सरी

आज अमरावरी शहरात पावसाच्या सरी कोसळल्या. दहा मिनिटाच्या पावसाने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे, त्यामुळे अमरावतीकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. वर्ध्यातील काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक पावसाने हजेरी लावली, वातावरणातील या बदलामुळे नागरिकांना तीव्र उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळाला.

बीडच्या आष्टी तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसांच्या सरी

आष्टी तालुक्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात पेरणीपूर्व शेती मशागतीला या पावसाचा चांगलाच फायदा होणार असल्याने शेतकरी थोडेसे समाधानी झाले आहेत.

Follow Us