ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; गांधीवादी चळवळीतील एक पर्व काळाच्या पडद्याआड

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्याबाबतचा तपशील कुटुंबीयांकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यभरातून शोकसंदेशांचा ओघ सुरू झाला आहे.

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; गांधीवादी चळवळीतील एक पर्व काळाच्या पडद्याआड
Dr. Kumar Saptarshi
| Updated on: Jul 18, 2026 | 7:17 PM

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून, समाजवादी आणि गांधीवादी चळवळीतील एक महत्त्वाचा आवाज हरपला आहे. डॉ. सप्तर्षी यांना मधुमेहाचा त्रास होता. शनिवारी सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने पुण्यातील एरंडवणे येथील जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या असंख्य अनुयायांनी हळहळ व्यक्त केली. समाज परिवर्तनाची चळवळ उभारणाऱ्या डॉ. सप्तर्षी यांनी आपल्या आयुष्यभर समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार केला. युवकांना संघटित करून सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद) या संघटनेची स्थापना केली होती. युक्रांदच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना सामाजिक भान, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांची प्रेरणा दिली.

डॉ. सप्तर्षी हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तर ते एक प्रभावी लेखक, अभ्यासू विचारवंत आणि वक्ते म्हणूनही ओळखले जात होते. समाजातील विषमता, अन्याय, भ्रष्टाचार आणि लोकशाही मूल्यांच्या ऱ्हासाविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला. गांधी, जयप्रकाश नारायण आणि समाजवादी विचारधारेचा प्रभाव त्यांच्या कार्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ग्रामीण विकास, शैक्षणिक सुधारणा, युवकांचे सक्षमीकरण आणि लोकशाही हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांच्या लेखनातून आणि व्याख्यानांतून अनेक पिढ्यांना वैचारिक दिशा मिळाली.

डॉ. कुमार सप्तर्षी यांनी विविध पुस्तके, लेख आणि भाषणांमधून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य केले. समाजकारणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन व्यापक आणि परिवर्तनवादी होता. त्यामुळेच ते युवकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान बनले होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक अभ्यासू समाजचिंतक, संवेदनशील लेखक आणि समाजपरिवर्तनासाठी झटणारा लढवय्या कार्यकर्ता गमावला आहे.

जनता पक्षात प्रवेश

९ ऑगस्ट १९७७ रोजी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षात डॉ. कुमार सप्तर्षी यांनी  प्रवेश केला होता.  जनता पक्षातर्फे १९७८ साली अहमदनगर शहरातुन  ते आमदार झाले होते.

 

.

Follow Us