DJ च्या वादानंतर विद्यानंद बापट काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत, आता लढ्यासाठी वेगळा मंच, मोठी अपडेट समोर
Vidyanand Bapat : विद्यानंद बापट हे आपला लढा बड्या आता समविचारी लोकांना सोबत घेऊन नवी फोरम स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

सामाजिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे विद्यानंद बापट गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. आता विद्यानंद बापट हे आपला लढा बड्या आता समविचारी लोकांना सोबत घेऊन नवी फोरम स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात सध्या चर्चा सुरू असून, लवकरच याबाबतची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे बापट यांनी सांगितले. ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर नागरी समस्यांवरही भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध सामाजिक आणि नागरी प्रश्नांवर एकत्रितपणे आवाज उठवण्यासाठी ही नवी फोरम काम करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी आता समविचारी लोकांना सोबत घेऊन नवी फोरम स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली आहे. आगामी काळात याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘माझ्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चात मी स्वतः उपस्थित राहणे योग्य नाही. मात्र, तब्येतीच्या कारणास्तवही मी मोर्चात सहभागी होऊ शकलो नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, मोर्चेकऱ्यांची आणि आपली भूमिका एकच असल्याचे सांगत ते म्हणाले की, ‘मोर्चेकऱ्यांची माझी भूमिका एकच आहे. मी देखील त्यावर पडद्यामागून काम करत आहे.’
दहीहंडीत महिलांना नाचवणे योग्य नाही
दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांना नाचवण्याच्या प्रकारावरही बापट यांनी नाराजी व्यक्त केली. दहीहंडी उत्सवात महिलांना नाचवणे योग्य नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. डीजे बंदीच्या मुद्द्यावर सरकारमध्ये एकमत होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले. एखादी व्यक्ती याबाबत वेगळी भूमिका घेत असेल, तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.
पुणे आणि नाशिकमध्ये परिस्थिती वेगळी नाही
ध्वनी प्रदूषणाचा त्रास केवळ पुण्यातच होत नसून नाशिकमध्येही नागरिकांना त्याचा सामना करावा लागत असल्याचे बापट यांनी सांगितले. ‘पुणे आणि नाशिक काही वेगळे नाही. तिकडेही लोकांना डीजेचा त्रास होत आहे, हे नाशिककरांना विचारा, असे ते म्हणाले. दरम्यान, दहीहंडी उत्सवाच्या काळात आपण घेतलेल्या भूमिकेचा अपेक्षित परिणाम झाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. दहीहंडी उत्सवात माझ्या भूमिकेचा शून्य परिणाम दिसला, असे विद्यानंद बापट यांनी म्हटले आहे.