सांगलीत स्पर्धा परीक्षा अकॅडमीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; रात्री झोपेत असतानाच… संतापजनक प्रकार समोर!
Sangli News : वाळवा तालुक्यातल्या एका निवासी स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी मधील 3 अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या एका निवासी स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी मधील 3 अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अकॅडमीच्या संस्थापकासह त्याच्या पत्नी विरोधात पोक्सो अंतर्गत आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अकॅडमीत धक्कादायक प्रकार
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील एका अकॅडमीमध्ये निवासी शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अकॅडमीचा संस्थापक काशीनाथ रामचंद्र नांगरे आणि त्याला साथ देत मुलींना धमकावणारी त्याची पत्नी मनीषा काशीनाथ नांगरे (दोघे रा. गोटखिंडी, ता. वाळवा) या दोघांवर आष्टा पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून काशिनाथ नांगरे याला अटक करण्यात आली असून त्याची पत्नी मनीषा नांगरे सध्या फरार आहे.
गेल्या 3 महिन्यांपासून अत्याचार
11 जून 2026 पासून अकॅडमीमध्ये हा संतापजनक प्रकार वारंवार घडत होता. अकॅडमीमध्ये निवासी शिक्षण घेणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुली रात्री झोपेत असताना, संस्थापक काशीनाथ नांगरे याने त्यांच्याजवळ जाऊन लैंगिक अत्याचार व विनयभंग केला आहे. दरम्यान पीडित मुलींनी या प्रकाराची माहिती अकॅडमीतील मॅडम आणि संशयित आरोपीची पत्नी मनीषा नांगरे यांना दिली.
मात्र, मुलींना मदत करण्याऐवजी तिने कोणाला काही सांगू नका, नाहीतर तुमचे शाळेचे नुकसान करेन,” अशी थेट धमकी देऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. यानंतर घाबरलेल्या पीडित मुलींनी अखेर हिंमत दाखवून आपल्या पालकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी तात्काळ आष्टा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
नागरिक संतप्त
दरम्यान, निवासी शाळेतल्या अल्पवयीन मुलींच्या बाबतीत घडलेल्या धक्कादायक प्रकरणानंतर जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटत आहेत. याशिवाय निवासी शाळांमधील मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे, राज्य सरकार अशा प्रकरणांमध्ये अजून गंभीर नाही असा आरोप करत मुलींच्या निवासी शाळेतील अत्याचाराबाबत राज्य सरकारने कडक कायदे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
