
रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनले आहे. पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झाले असून 2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर (Flood) आला आहे.

शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये सात फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत.

चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे.

वाशिष्टी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. पाणी वाढण्याचा वेग मोठा आहे.

शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड , भोगाळे , परशूराम नगर याबरोबरच खेंड परिसरात पाणी वाढत आहे. रॉयल नगर तसेच राधाकृष्ण नगरमधील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या चारचाकी व दुचाकी पाण्याखाली आहेत.

याशिवाय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक जण घरात अडकले आहेत. पहाटे चार वाजल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागले. शहरालगतच्या खेर्डीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून अनेक घरे पाण्याखाली आहेत. याशिवाय पावसाचा जोर वाढत असून पाणी पातळीत तीव्र गतीने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

हायटाईड व अतिवृष्टी वेळ एकत्र आल्यामुळे खेड व चिपळूण मध्ये गंभीर परिस्थिती आहे असे जिल्हा प्रशासनकडून सांगण्यात आले आहे. बचावकार्यासाठी स्थानिक चिपळूण नगरपालिका 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालु केले आहे.

तर रत्नागिरी मधून 1, पोलीस विभागाकडील 1 व कोस्टगार्डची 1 बोट अश्या 3 बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविणेत आल्या आहेत.

पुणे हुन NDRF च्या दोन टीम पुणे (खेड साठी 1 व चिपळूण साठी 1) येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करणेत येत आहेत. तातडीची गरज लगल्यास 94202 44937 अजय सूर्यवंशी, आपत्ति निवारण अधिकारी यांना संपर्क करावा असे आव्हान करण्यात येत आहे.

कोकणात पावसाने हाहाकार उडवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराचा बहुसंख्या भाग पाण्याखाली गेला आहे. रस्ते, बाजारपेठा पूर्णत: पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. घरंच्या घरं बुडाली आहेत. चिपळूण शहराला पाण्याचा वेढा पडला आहे. अशा भीषण स्थितीमुळे शिवसेना खासदार विनायक राऊत दिल्लीवरुन कोकणाकडे रवाना होत आहेत. खासदार विनायक राऊत हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत.