मुंबईतील टॉप कॉलेजच्या हॉस्टेलची दुरावस्था! खोल्या प्रचंड अस्वच्छ, इमारती चिंताजनक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईतील टॉप कॉलेजच्या हॉस्टेलची दुरावस्था झाली आहे. या हॉस्टेलच्या खोल्या प्रचंड अस्वच्छ असून इमारती चिंताजनक झाल्या आहेत.

राज्यात इंजिनीअरची हजारो कॉलेज आहेत. परंतु इंजिनीअरिंगचे टॉप कॉलेज हे मुंबई-पुणे सारख्या महत्वाच्या शहरात आहेत. त्यात मुंबईतील व्हीजेटीआय कॉलेजचं नाव आघाडीवर आहे. राज्यात आघाडीवर असलेल्या या कॉलेजच्या हॉस्टेलची दुरावस्था समोर आली आहे. कॉलेजमधील काही विद्यार्थी बाहेर परवडत नसल्याने याच हॉस्टेलमध्ये राहतात. परंतु याच कॉलेजच्या हॉस्टेलची इमारत देखील चिंताजनक अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खोल्या अस्वच्छ, भितींना तडे
मुंबईतील प्रसिद्ध व्हीजेटीआय कॉलेजच्या हॉस्टेलची दुरवस्था समोर आली आहे. हॉस्टेलच्या खोल्यांमध्ये अस्वच्छता आणि भिंतींना तडे गेल्याचे चित्र समोर आलंय. अनेक ठिकाणी इमारतीची अवस्था चिंताजनक असल्याचा दावा करण्यात येत आहे. इमारतीचे स्लॅब कोसळू नये म्हणून सुरक्षेसाठी जाळ्या बसवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या ठिकाणी मूलभूत सुविधांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
कॉलेज प्रशासन काय भूमिका घेणार?
हॉस्टेलमधील परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कॉलेज प्रशासनाकडून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जुन्या इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने दुरुस्ती आणि स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे. व्हीजेटीआय प्रशासन यावर काय भूमिका घेणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांकडून डेव्हलेपमेंट फी घेऊनही हॉस्टेलमध्ये सुविधांची वाणवा असल्याचे पाहायला मिळत आहे.
तत्पूर्वी, हॉस्टेलचं पुर्ननिर्माण करण्याचा प्रस्ताव फडणवीस सरकारकडे पाठवल्याचा दावा कॉलेजकडून करण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी एक वर्ष लागेल. तर मंजूर झाल्यानंतर दीड ते दोन वर्षांत नवीन हॉस्टेलची इमारत बांधली जाईल. त्यात 500 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होईल, असं कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. परंतु आता नवीन हॉस्टेलची इमारत किती दिवसांत बांधून होईल, हे प्रत्यक्षात काम हाती घेतल्यानंतरच समोर येईल. आता यावर शिक्षणमंत्री काय भाष्य करतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.