मालकिणीच्या जाण्याने वाघ्याने सोडले अन्न पाणी, कुत्र्याचे अश्रू थांबेना, जिथे बसला तिथेच..
प्राणी एखाद्यावर किती जास्त प्रेम करू शकते, याचे उदाहरण पुढे आले. याचा हृदयस्पर्शी प्रत्यय भोर तालुक्यातील संगमनेर गावात पाहायला मिळत आहे. शालन बांदल या वृद्ध महिलेच्या निधनानंतर त्यांचा लाडक्या वाघ्याने अन्न पाणी सोडले.

प्रतिनिधी विनय जगताप, पुणे भोर : माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं किती घट्ट आणि भावनिक असू शकतं, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय भोर तालुक्यातील संगमनेर गावात पाहायला मिळत आहे. शालन बांदल या वृद्ध महिलेच्या निधनानंतर त्यांचा लाडका वाघ्या नावाचा कुत्रा अक्षरश शोकसागरात बुडाला आहे. मालकिणीच्या मृत्यूनंतर गेल्या चार दिवसांपासून वाघ्याने अन्नाचा कणही घेतलेला नाही. शालन बांदल यांनी वाघ्याला लहानाचे मोठे केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून वाघ्या त्यांच्या सावलीसारखा सोबत राहत होता. शुक्रवारी वृद्धापकाळाने शालन यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला; मात्र, या विरहाचा सर्वाधिक परिणाम वाघ्यावर झाल्याचे दिसून येत आहे.
घरातील एका कोपऱ्यात बसून मालकीण ज्या ठिकाणी झोपायच्या किंवा बसायच्या, त्या जागेकडे तासन्तास टक लावून पाहत असतो. तो काहीही हालचाल करत नाहीये. घरच्यांकडून दूध, चपाती आणि इतर अन्न देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, वाघ्या त्याकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे कुटुंबिय सांगतात.
विशेष म्हणजे शालन यांच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या सावडण्याच्या विधीलाही वाघ्याने हजेरी लावली. भाटघर धरणाच्या भिंतीपासून काही अंतरावर असलेल्या संगमनेर गावच्या स्मशानभूमीत तो विधीच्या ठिकाणी शांतपणे बसून राहिला. मालकिणीच्या आठवणीने त्याच्या डोळ्यांतून अश्रू येत असल्याचे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
वाघ्या हा आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
आई गेल्यापासून त्याने काहीही खाल्लेले नाही. आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहोत. दिवसातून तीन-चार वेळा त्याच्यापुढे दूध आणि चपाती ठेवतो. मात्र, तो अन्नाकडे न पाहता आई ज्या ठिकाणी घरात असायची, त्याच जागेकडे पाहत अश्रू ढाळत बसतो, असे कुटुंबीयांनी सांगितले. मालकिणीच्या निधनानंतरही तिची वाट पाहत राहिलेला वाघ्या पाहून संगमनेर गावातील नागरिकही हळहळ व्यक्त करत आहेत. प्राण्यांचे माणसांवरील प्रेम आणि निष्ठा किती अथांग असू शकते, याची जाणीव करून देणारी ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे..