संसदेमध्ये खरच मोदींवर काँग्रेसकडून हल्ला केला जाणार होता? तिथे नेमकं काय घडलं? वर्षा गायकवाड यांनी सगळं सांगितलं

काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न होणार होता, असा आरोप करण्यात येत आहे, त्यानंतर आता वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

संसदेमध्ये खरच मोदींवर काँग्रेसकडून हल्ला केला जाणार होता? तिथे नेमकं काय घडलं? वर्षा गायकवाड यांनी सगळं सांगितलं
Varsha Gaikwad
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 05, 2026 | 4:59 PM

सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, मात्र सध्या हे अधिवेशन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे, ते म्हणजे लोकसभा सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होणार होता. तशी योजना तयार केली जात होती, त्यासाठी महिला खासदारांना पुढे पाठवण्यात आले होते, असा गंभीर आरोप होत आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर कोणतंही भाषण केलं नाही, अशी माहिती देखील समोर येत आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही त्या ठिकाणी फक्त बॅनर घेऊन गेलो होतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

निशिकांत दुबे जेव्हा-जेव्हा बोलण्यासाठी उभे राहतात तेव्हा बोलण्यासाठी त्यांना पूर्णवेळ संधी मिळते. पण जेव्हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलण्यासाठी उभे राहतात, ते देशाच्या सुरक्षेसंदर्भात बोलतात, चीनकडून सुरू असलेल्या घुसखोरीबाबत बोलतात, त्यावेळी सातत्याने त्यांचा माईक बंद करण्याचं काम होतं. त्यांना बोलू दिलं जात नाही. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की, आम्हाला तुमच्याकडून निपक्षपाती भूमिकेची अपेक्षा आहे.

संसदीय लोकशाहीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पहिली गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की, माझं आर्ध आयुष्यच हे संसदीय लोकशाहीमध्ये गेलेलं आहे. आमचा देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे. काँग्रेस पक्षात मी काम करते आणि काँग्रेस पक्षाने, महात्मा गांधी यांनी आम्हाला काय शिकवलं तर अहिंसा शिकवली आहे, आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, आम्ही त्या ठिकाणी का गेलो होते तर आम्ही त्या ठिकाणी फक्त एक बॅनर घेऊन गेलो होतो. आता तुम्ही म्हणाल की बांगड्या का घालून गेलात तर आम्ही बांगड्या काढून जाऊ शकत नव्हतो. आणि आम्हाला याची कल्पना देखील नव्हती की आमच्या बांगड्यांचा एवढा विषय होईल. आम्ही त्या ठिकाणी बॅनर घेऊन उभे होतो, आमचं म्हणणं हेच आहे की, बॅनरला एवढं
घाबरण्याचा प्रश्न काय? आम्ही शांततेच्या मार्गानं आंदोलन करत होतो, घाबरण्यासारखं असं त्या बॅनरमध्ये काय होतं? असा प्रश्नही यावेळी वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

Follow Us