नरेंद्र मोदी यांच्यावर संसदेत हल्ला करण्याचा प्लॅन? काँग्रेसच्या खासदारांनी…हादरवणारी अपडेट समोर!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शारीरिक हल्ला करण्याचा कट होता, असा दावा संसदेच्या सचिवालयाने केला आहे. काँग्रेसने मात्र हा दावा फेटाळला आहे.

Narendra Modi Attack : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनचा गुरुवारचा (5 फेब्रुवारी) सातवा दिवस आहे. यावेळी अधिवेशनात विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा धारण केला आहे. माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे वरंवार लोकसभेचे कामकाज तहकुब करावे लागत आहेत. आजदेखील लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव विरोधकांच्या गोंधळातच आवाजी मतदाने मंजूर करण्यात आला. दरम्यान 22 वर्षांमध्ये पहिल्यांदाच हा प्रस्ताव पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण न करण्यामागचं कारणही समोर आलं आहे. काँग्रेसकडून संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याची तयारी होती, असा दावा केला जातोय.
महिला खासदारांचा ढाल म्हणून वापर केल्याचा आरोप
लोकसभा सचिवालयातील सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या 22 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर भाषण केले नाही. काँग्रेस पक्ष लोकसभेत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर शारीरिक हल्ला करण्याचा प्रयत्न करणार होता, तशी योजना तयार केली जात होती. त्यासाठी महिला खासदारांना ढाल म्हणून पुढे पाठवण्यात आले होते, असा दावा केला जातोय. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर कोणतेही भाषण केले नाही. त्यानंतर सभागृहातील गोंधळ लक्षात घेता लोकसभेच्या अध्यक्षांनी कामकाज स्थगित केले.
म्हणून मोदींनी भाषण न करण्याचा निर्णय घेतला
लोकसभा सचिवालयातील सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान भाषण करण्यास तयार होते. तशी तयारीही करण्यात आली होती. परंतु लोकसभेचे कामकाज चालू झाले, तेव्हापासूनच विरोधकांनी गदारोळ केला. याच गोंधळादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा काँग्रेसच्या खासदारांचा प्लॅन होता. याबाबत सचिवालयाकडून काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा चालू होती. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भाषण न करण्याचा निर्णय घेतला.
मोदी एपस्टीन फाईल्सला घाबरले आहेत का?
दुसरीकडे काँग्रेसने मात्र हा दावा फेटाळला आहे. आम्ही फक्त बॅनर घेऊन गेलो होतो. भाजपाकडून खोटा दावा केला जात आहे, असे काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. तसेच मोदी एपस्टीन फाईल्सला घाबरले आहेत का? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
