वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यात जुलैपासून जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून 138 पैकी 2 मध्यम आणि 61 लघु प्रकल्पांसह 63 लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. सर्व प्रकल्पांत सरासरी 67.08 टक्के जलसाठा झाल्याने सिंचनासह पुढील वर्षीच्या पाणीटंचाईची समस्या (Problem) मिटलीयं. वाशिम जिल्ह्यात तीन मध्यम आणि 11 बॅरेजेसह 135 लघू प्रकल्प मिळून एकूण 138 प्रकल्प आहेत. यातील बहुतांश प्रकल्प सिंचनासाठी उभारण्यात आले असले तरी काही प्रकल्पांवर पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत.
गत तीन वर्षांत दमदार पावसामुळे प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात साठा झाला होता. परिणामी पाणीटंचाईची झळ फारशी जाणवली नाही. यंदाही जिल्ह्यात जुलैपासून दमदार पाऊस पडल्याने प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात एकूण 63 प्रकल्प शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि जनतेला पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळणार आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८१ टक्के पाऊस पडला आहे. अद्याप पावसाचे 50 दिवस बाकी असल्याने पाऊस सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे.
वाशिम जिल्ह्यातील 17 महसुल मंडळात रविवारी व सोमवारी अति मुसळधार पाऊस पडला असून या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे हजारो हेक्टरवरील खरिपाच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं असून नदीनाल्या काठावरील शेती खरडून गेली आहे. शासनाने शेती पंचनाम्यासाठी कोणतेही निकष न लावता सरसकट भरपाई देण्याची मागणी होतेय. वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचवीस गावांचा संपर्क तुटला होता, अनेक गावात पुराचे पाणी शिरले होते.