वाशिम मुसळधार! 24 तासात 33 मिमी पाऊस, घरांची पडझड अन् पिकं पाण्याखाली…
Washim Rain Update : राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस , वाशिम जिल्ह्यात शेतांना तलावाचं स्वरूप, घरांची पडझड; शेतकरी हवालदिल
वाशिम | 23 जुलै 2023 : राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस पडतो आहे. अशाताच वाशिम जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडतोय. मागील 24 तासात वाशिम जिल्ह्यात सरासरी 33 मिमी पाऊस झाला आहे. वाशिमच्या कारंजा आणि मानोरा या तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. कारंजात 50.8 मिमी तर मानोऱ्यात 64.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मानोरा तालुक्यातील उमरी मंडळात झाला आहे. तिथे 95.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
वाशिममध्ये मुसळधार पावसाने मोठं नुकसान झालं आहे. वाशिम जिल्ह्यात 14 घरांची पडझड झाली आहे. तर दोन जनावरं दगावली आहेत.
कारंजा आणि मानोरा तालुक्यातील बेंबळा, साखळी,उमा, कापशी, कमळगंगा आणि इतर नदी नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे 22 गावांचा संपर्क तुटला होता. नदीकाठची जमीन पुरामुळे खरडून गेल्याने शेकडो एक्कर वरील पिकं वाहून गेली आहेत.
वाशिम जिल्ह्यात जवळपास 7 ते 8 हजार हेक्टर शेतीच नुकसान झालं आहे. कारंजा तालुक्यातील पिंपरी मोडक, हिवरा लाहे, मोहगव्हान या गावात पुराचं पाणी शिरलं होतं. पण आता या भागातील पाण्याचा पूर्णपणे निचरा झाला आहे.
मानोरा तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील बेलोरा गावाला खोराडी नदीचा तर वरोली आणि कारखेडा,तडप गावाला अरुणावती नदीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुरामुळे गावातील घरांचे आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हा पंचनामा झाल्यास नागरिकांना मदत मिळू शकेन. शिवाय त्यांना आर्थिक नुकसान टाळता येईल.
वाशिमच्या मानोरा तालुक्यात अतिवृष्टी मुळे शेतीच अतोनात नुकसान झालं आहे. नदीकाठच्या गावांत पुरामुळे पशुधन आणि घरांची पडझड असं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
शेतात पाणी साचल्याने शेतांना तलावाचे स्वरूप आल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणी स्थानिक करत आहेत. दिग्रस -मानोरा महामार्गावर माहुली इथं आक्रमक झालेले शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी सरकारने मदत करावी, आमची आर्थिक ओढाताण होणार नाही, असं या शेतकऱ्यांनी म्हटलं.