‘ लग्न करायचं नव्हतं तर नकार द्यायचा, माझ्या लेकाला का मारलं..?’ केतन अग्रवालच्या पालकांचा आक्रोश, केली मोठी मागणी
Ketan Agarwal Murder Case : लोहागड किल्ल्यावरून ढकलून दिल्यानंतर मृत झालेल्या केतन अग्रवालच्या पालकांचा आक्रोश समोर आला आहे. "जर तिला हे लग्न मान्य नव्हते, तर तिने सरळ नकार दिला असता; तिने माझ्या निष्पाप मुलाचा जीव का घेतला?" असा सवाल शोकाकुल आई-वडिलांनी विचारलाय.

Parents Demand Death Penalty In Ketan Murder : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन विशाल अग्रवाल हत्याकांड हे फक्त केवळ कायदा व सुव्यवस्थेलाच नव्हे, तर मानवी संवेदनांनाही हादरवून सोडणारं ठरलं आहे. केतन आणि त्याचे कुटुंबीय ज्या सियाचं मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने आपल्या घरात स्वागत करण्याची तयारी करत होते, त्याच भावी वधूने आपल्या प्रियकरासोबत मिळून केतनला मारण्याचा कट रचला. या धक्कादायक प्रकारामुळे केतनचे आई-वडील पूर्णपणे कोलमडून गेले आहेत; त्यांच्या डोळ्यातील अश्रूंना खळ नसून त्यांना सावरणं कठीण झालं आहे. या अत्यंत दुःखाच्या आणि वेदनेच्या काळात त्यांनी सरकारकडे केवळ एकच मागणी केली आहे : ती म्हणजे त्यांच्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी.
सामाजिक संकेत आणि मुलांच्या जडणघडणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, केतनच्या व्यथित वडिलांनी म्हटलं की, जर सिया गोयलला त्यांच्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं, तर तिने सरळ नकार दिला असता. आपण स्वत: हे लग्न त्वरित रद्द केलं असतं. पण त्याऐवजी, ती इतकी क्रूर वागली की, तिने त्यांच्या 26 वर्षांच्या आनंदी आणि उत्साही मुलाला जगातूनच कायमचं नाहीसं केलं.
वडिलांनी केला धक्कादायक खुलासा
पुढे एका धक्कादायक खुलाशात केतनच्या वडिलांनी, विशाल यांनी सांगितलं की, फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाल्यानंतर केतन आणि सिया यांनी परदेश प्रवासाचं प्लानिंग केलं होतं. सहा जून रोजी चार जण बालीला जाणार होते. परंतु ऐनवेळी केवळ केतनचाच पासपोर्ट चोरीला गेला. त्यामुळे त्याला विमानतळावरून परत यावं लागले. पण तेही एक सुनियोजित कारस्थान होतं हे आता स्पष्ट होतंय.
केतनचा मृत्यू झाला त्या दिवसाबद्दल बोलताना विसाल अग्रवाल म्हणाले की, आरोपी चेतन हा बाईकने लोहगडावर पोहोचला. तो आणि सिया तिथे होते, त्यांनी केतनच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला आणि त्यानंतर त्याला डोंगरावरून खाली ढकलून दिले. पुढे, विशाल यांनी पुणे ग्रामीण पोलीस आणि पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांचे आभार मानले, आणि पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईची दखल घेतली. या प्रकरणाची सुनावणी ‘फास्ट-ट्रॅक’ न्यायालयात व्हावी आणि दोषींना अशी शिक्षा व्हावी, अशी विनंती केतनच्या वडिलांनी सरकारकडे केली आहे.
तिने मला धोका दिला, तिला फाशी द्या
केतनच्या जाण्यामुळे त्याच्या आईची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. रडून रडून त्यांचे डोळे सुजलेत. ” सियाने माझा अतिशय मोठा विश्वासघात केला. असं त्या म्हणाल्या. मला आधी सियाबद्दल कधीच कोणतीही शंका वाटली नव्हती; ती आमच्याकडे वारंवार यायची. आम्ही एकत्र खरेदीला जायचो, अनेकदा बाहेर जेवायलाही गेलो होतो आम्ही, पण सिया इतकी कपटी आणि क्रूर निघेल, याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. माझ्या मुलाच्या मृत्यूला सिया आणि तिचा प्रियकर पूर्णपणे जबाबदार आहेत आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे “, असं केतनच्या आईने सांगितलं.
बहीणीली शंका आणि पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितलं की, 18 जून रोजी सिया गोयलने केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल केली होती. केतन हा एक अनुभवी ट्रेकर असल्याने त्याच्या कुटुंबीयांना हा दावा पटला नाही. अंत्यसंस्कारांनंतर जेव्हा केतनच्या बहिणीने सियाकडे विचारणा केली, तेव्हा तिच्या बोलण्यावरून कुटुंबीयांचा संशय खात्रीत बदलला.
तांत्रिक पुरावे, कॉल रेकॉर्ड्स आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी सियाचा मित्र चेतन चौधरी याला ताब्यात घेतलं, तेव्हा संपूर्ण कटाचा उलगडा झाला. केतनला ढकलून त्याची हत्या केल्याची कबुली सिया आणि चेतन या दोनही आरोपींनी पोलिसांकडे दिली . पुणे न्यायालयाने दोन्ही आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.