Ashwini Paul: माहेरून सोन्याच्या पाटल्या, ऑटोसाठी पैसे घेऊन ये; राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या मृत्यूने खळबळ, FIRमध्ये गंभीर आरोप

Ashwini Paul Case: राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या मृत्यूप्रकरणी एफआयआरप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून सोन्याच्या पाटल्या आणि रिक्षासाठी पैसे मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Ashwini Paul: माहेरून सोन्याच्या पाटल्या, ऑटोसाठी पैसे घेऊन ये; राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या मृत्यूने खळबळ, FIRमध्ये गंभीर आरोप
अश्विनी पौळ
Image Credit source: Tv9
| Updated on: Sep 04, 2026 | 4:13 PM

राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी त्यांच्या तीन लहान मुलांसह धाराशिवमधल्या नळदुर्ग किल्ल्यावरून 100 फूट खोल दरीत उडी घेतली. या धक्कादायक घटनेत अश्विनी आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती नावाच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी असून तिच्यावर धाराशिव इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. अश्विनी यांचे वडील तानाजी मोहिते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. या एफआयआरमध्ये तानाजी यांनी त्यांच्या जावयावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

मुलींच्या जन्मानंतर अश्विनी यांना अधिक त्रास देण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. सोन्याच्या पाटल्या आणि ऑटो रिक्षा घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, यासाठी मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तानाजी यांची मुलगी अश्विनी यांचं लग्न 2020 मध्ये मनोहर अंकुश पौळ यांच्याशी झालं होतं. लग्नानंतर काही काळाने त्यांना मुलगा झाला. तक्रारीनुसार, 2021 मध्ये मुलगी अश्विनी आणि तिचा मुलगा अजिंक्य काही काळ माहेरी आले होते. त्यानंतर त्या पुन्हा सासरी गेल्या. त्यानंतर 2024 मध्ये त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या. दोन मुलींच्या जन्मानंतर सासरच्या मंडळींकडून त्यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पती मनोहर पौळ तसंच सासरच्या अन्य व्यक्तींकडून त्यांना त्रास दिला जात असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

सोन्याच्या पाटल्या आणि ऑटोसाठी पैशांची मागणी

‘दोन जुळ्या मुली झाल्या आहेत. तुझ्या आईवडिलांनी लग्नाच्या वेळी हुंड्यामध्ये काही दिलेलं नाही. त्यामुळे तू माहेरून सोन्याच्या पाटल्या आणि ऑटोरिक्षा घेण्यासाठी पैसे घेऊन ये, असं म्हणून वारंवार तिला मारहाण करून मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचं आम्हाला अश्विनी फोनवर सांगत होती. त्यामुळे अश्विनीला सासरच्या लोकांकडून त्रास होऊ नये म्हणून त्यांना एक म्हैस विकत घेऊन दिली होती. तरीही अश्विनीच्या सासरचे लोक तिला त्रास देत होते,’ असं वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटलंय.

एफआयआरमधील आरोपानुसार, लग्नाच्या वेळी हुंड्यामध्ये काही दिलं नसल्याचं सांगून अश्विनी यांचा छळ केला जात होता. सोन्याच्या पाटल्या घेण्यासाठी तसंच ऑटो रिक्षा घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली होती. पैसे आणले नाहीत तर तिला मारहाण केली जात असल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या सततच्या त्रासामुळे अश्विनी यांना मानसिक तसंच शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं. सासरच्या लोकांकडून होणारा त्रास वाढत गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या माहेरच्या व्यक्तींना याबाबत माहिती दिल्याचंही FIRमध्ये नमूद आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us