ज्या कोठडीत कसाब, दाऊदचा भाऊ तिथेच मला… संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट, मी फक्त दोनच गोष्टी…
ईडीने अटक केल्यानंतर ज्या कोठडीत ठेवलं, तिथे पूर्वी दाऊदचा भाऊ होता, तर कसाबला ठेवलेल्या सेलमध्ये मला ठेवलं. आम्ही देशासाठी किती भयंकर लोक होतो असे वाटले. पण आम्ही घाबरलो नाही, त्यामुळे ईडी-सीबीआयची दहशत कमी झाली, असा दावा संजय राऊत यांनी केला.

मला अटक ईडीने केल्यानतर ज्या कोठडीत ठेवलं होतं. तिथे पूर्वी दाऊदचा भाऊ होता. तर तुरुंगात कसाबला ज्या सेलमध्ये ठेवलं होतं, तिथेच मला आणि अनिल देशमुख यांना ठेवलं होतं. आम्ही देशातील फार भयंकर लोक असल्यासारखी आम्हाला वागणूक देण्यात आली होती, असं सांगतानाच आम्ही घाबरलो नाही. आम्ही बिनधास्त तुरुंगात गेलो. त्यामुळेच ईडी आणि सीबीआयची दहशत कमी झाली आणि नंतरच्या काळात ईडी आणि सीबीआयच्या कारवायाही कमी झाल्या, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
कोल्हापुरात दिनमान साहित्य उत्सावाचं आयोजन करण्यात आलं आहे. या साहित्य उत्सवात संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी तुरुंगातील दाहक अनुभव सांगितले. यावेळी त्यांनी दिमागी नक्षलवादी या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारवर टीका केली. दाऊदचा भाऊ अटकेत ठेवला होता त्या कोठडीत ईडीने मला ठेवलं होतं. तुरुंगात जिथे कसाबला ठेवलं होतं तिथे मला आणि अनिल देशमुखांना ठेवलं. म्हणजे आम्ही देशातील इतके भयंकर लोकं होतो. कोबाड गांधींनाही त्यांचं जीवन त्यांच्या पुस्तकात मांडलं आहे. म्हणून मी त्या पुस्तकाचा माझ्या पुस्तकात उल्लेख केला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
नवीन पुस्तक येतंय
माझ्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचा दुसरा भाग येत आहे. त्याचं नाव आहे ‘बोध कीर्तन’ असं ठेवलं आहे. आधीच्या पुस्तकातील काही गोष्टी सुटल्या आहेत. पुस्तक लिहिताना काही नोंदी करत होतो. त्याचं वेगळं पुस्तक येतंय. पण कोबाड गांधींचं पुस्तक फ्रॅक्चर्ड फ्रिडमने देशातील सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. त्याचं ते उत्तम रेखाटन आहे. म्हणून त्याचा मी माझ्या पुस्तकात उल्लेख केला आहे, असं राऊत म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, माफ करा
माझं पुस्तक प्रकाशित होऊन एक वर्ष झालं. महाराष्ट्रात चांगलं वाचलं गेलं. एक वर्षानंतर मी ते पुस्तक पाहत आहे. एकदा लिहिलं, सोडून दिलं. आता लोकांनी ठरवायचं. त्या पुस्तकाचं इंग्रजीत प्रकाशन झालं. ते राहुल गांधींनी वाचलं. माझ्याशी चर्चाही केली. राहुल गांधी प्रकाशनाला येणार होते. पण पुस्तकातील वादग्रस्त भागामुळे ते आले नाही. मला माफ करा म्हणाले, असं राऊत यांनी सांगितलं.
मीही दिमागी नक्षलवादी
कोबाड गांधींना बौद्धिक नक्षलवादी ठरवलं आहे. दिमागी नक्षलवाद. म्हणजे हुशार. ज्याला डोकं आहे. मेंदू आहे. असे हुशार लोकं. हुशार लोकं बंडखोर असतात. कोबाड गांधी हे फाटके नव्हते. मी त्यांचा अभ्यास केला. त्यांना भेटलो. ते 10 वर्ष तुरुंगात होते. तिहारला, झारखंडला, तामिळनाडूत होते. त्यांना फिरवत होते. 10-11 वर्षांनी सुटल्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं. ते पुस्तक मोदींनी वाचलं पाहिजे. म्हणजे दिमागी नक्षलवादी काय असतो हे त्यांना कळेल. कोबाड गांधींनी विदर्भात आदिवासींचं संघटन केलं. विडी उत्पादकांचं संघटन केलं. मुंबईत झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन कामं केली. असंख्य कामे केली. पारशी माणूस आहे. त्यांचं पुस्तक मी आधीच वाचलं होतं. तुरुंगात परत एकदा वाचलं. त्याच्या आणि माझ्या कहाणीत साम्य आहे. मीही दिमागी नक्षलवादी आहे, असं राऊत म्हणाले.
मारामारी आणि पुस्तक दोनच गोष्टी
दिमागी नक्षलवादी ही टर्म आम्हाला पाहूनच सूचली असेल. सूचायलाच पाहिजे. मी दोन गोष्टी उत्तम करू शकतो. मी चांगलं पुस्तक लिहू शकतो आणि चांगली मारामारी करू शकतो. ते आम्ही तुरुंगात केलं. ईडीच्या कोठडीत केलं. माणसानं मूळ स्वभाव सोडायचं नाही, असंही राऊत म्हणाले.
