Rakhi Sawant : ‘स्वयंवर’ केलं, पण पती शोधण्यासाठी नव्हे तर.. राखी सावंतचा मोठा खुलासा !
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने तिच्या बहुचर्चित 'स्वयंवर' शोमागील खरा हेतू नुकताच उघड केला आहे. राखीने सांगितले की, 'स्वयंवर' प्रेम किंवा पती शोधण्यासाठी नव्हे, तर ..

बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ही तिच्या बोल्ड अंदाजासाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या मनात येतं ते ती करते, तेच बोलते, काही आडपडदा बाळगत नाही. याच राखीने 2009 साली एक स्वयंवर ठेवलं होतं, त्यामध्ये तिला 16 पुरूषांना डेट करत जाणून घ्यायचं होतं आणि त्यातून एकाची पती म्हणून निवड करायची होती. ‘राखी का स्वयंवर’ हा भारतातील सर्वात चर्चित रिअॅलिटी शोपैकी एक होता. राम कपूरद्वारे आयोजित या शोमध्ये बिझनेसमन, अभिनेता, मॉडेल, पोलीस, कोरिओग्राफर, फिटनेस ट्रेनर आणि ज्योतिषी देखील सामील झाले होते. त्या सगळ्यांनाच राखीशी लग्न करायचं होतं. मात्र ते स्वयंतवर नेमकं का केलं याचा खुलासा आता ‘ड्रामा क्वीन’ राखीने केलाआहे. पण त्यावेळी तिला पती नको होता, ही एक वेगळीच गोष्ट आहे.
का रचलं स्वयंवर ?
बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री राखी सावंत आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. नुकतीच ती कॉमेडियन रौनक रजानी यांच्या Relationshit Advice या शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी राखीने तिच्या बहुचर्चित ‘स्वयंवर’ शोविषयी एक मोठा खुलासा केला. राखीने सांगितलं की, त्या काळात तिचा प्रेम किंवा लग्न करण्यापेक्षा स्वतःचं घर घेण्यावर अधिक भर होता. ती म्हणाली, ‘ स्वयंवरमध्ये मी नवरा शोधत असल्याचं दाखवलं होतं, पण खरं सांगायचं तर त्यावेळी माझं लक्ष बॉलिवूडकडे होतं. मी खूप नवीन होते आणि तरूण होते. मी काही प्रेमाच्या शोधात नव्हते’ असं तिने स्पष्टच सांगितलं.
राखी पुढे म्हणाली की, तिला फक्त स्वतःचं घर खरेदी करायचं होतं. ‘ मी भाड्याच्या घरात राहत होते आणि मला लोखंडवाला येथे स्वतःचे घर घ्यायचं होतं. त्यामुळे मला पैसे कमवायचे होते. बँकेत पैसे जमा करणे हाच स्वयंवर करण्यामागचा माझा मुख्य उद्देश होता ,’ असा खुलासा तिने केला. तिने पुढे सांगितलं की, एकीकडे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते तिला कामाच्या स्क्रिप्ट ऐकवत होते, तर दुसरीकडे स्वयंवरमधून तिला पैसे मिळत होते.
दुसरे स्वयंवर का झालं नाही ?
‘राखी का स्वयंवर’मध्ये अनेक टप्पे पार केल्यानंतर राखीने कॅनडातील व्यावसायिक एलेश परुजनवाला याची निवड केली होती. दोघांनी साखरपुडाही केला होता. मात्र, त्यांचं लग्न झालं नाही आणि काही काळानंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर राखीने ‘राखी का दूसरा स्वयंवर’ करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी या प्रक्रियेत आपल्या कुटुंबीयांनाही सहभागी करून घेणार असल्याचंही तिनं सांगितलं होतं. मात्र, तिचं दुसरं स्वयंवर प्रत्यक्षात कधीच पडद्यावर आलं नाही.
यावेळी राखीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही भाष्य केले. अनेक पुरुषांकडून फसवणूक झाल्यानंतर तिचा प्रेमावरील विश्वास उडाला असल्याचं तिने नमूद केलं. सध्या आपण सिंगल असल्याचेही राखीने स्पष्ट केलं.
