AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MOVIE REVIEW BABA  : शब्दांच्या पलिकडचा ‘बाबा’

नात्याला शब्दांचं बंधन नसतं. काही नाती तर शब्दांपलिकडली असतात. शब्दांशिवाय गुंफलेल्या नात्यांची अशीच एक गोष्ट 'बाबा' या सिनेमात तुम्हाला बघायला मिळणार आहे.

MOVIE REVIEW BABA  : शब्दांच्या पलिकडचा 'बाबा'
| Updated on: Aug 02, 2019 | 10:21 PM
Share

मुंबई : नात्याला शब्दांचं बंधन नसतं. काही नाती तर शब्दांपलिकडली असतात. शब्दांशिवाय गुंफलेल्या नात्यांची अशीच एक गोष्ट ‘बाबा’ या सिनेमात तुम्हाला बघायला मिळणार आहे. ‘बाबा’ संजय दत्तचा निर्माता म्हणून पहिला मराठी चित्रपट असल्यामुळे साहजिकच या सिनेमाबद्दल उत्सुकता होती. आई-मुलाच्या नात्याची गुंफण दाखवणारे बरेच चित्रपट मराठीसह हिंदीतही आले. पण मुलाचं आपल्या वडिलांसोबतचं नातं अधोरेखित करणारे क्वचित सिनेमे आपल्याला बघायला मिळतात. ‘बाबा’ या सिनेमातूनही वडीलांची आपल्या मुलाशी शब्दांशिवाय जोडलेली ही ‘नाळ’ किती घट्ट असते हे दाखवलं आहे. बॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अनुभव गाठिशी असणाऱ्या राज गुप्ता यानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. चांगली कलाकृती करण्यासाठी भाषा कधीच आडवी येत नाही हे राजनं दाखवून दिलं. नि:शब्द भावनांचा हा अप्रतिम खेळ प्रेक्षकांना शेवटपर्यंत मंत्रमुग्ध करण्यात यशस्वी ठरला आहे. सुनिल दत्त यांनी आपल्या अजंठा आर्टस बॅनरखाली अनेक आशयघन सिनेमांची निर्मिती केली. आता संजय दत्तने संवेदनशील विषय मराठी सिनेमात हाताळत वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकलं आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.

रत्नागिरीतील छोट्याश्या गावात राहणाऱ्या माधव (दीपक दोब्रियाल), आनंदी (नंदिता पाटकर) आणि त्यांचा मुलगा शंकर (आर्यन मेघजी) यांची ही कथा. मूकबधिर असून आणि आर्थिक परिस्थिती बेताची असूनही, मुलाला कायम आनंदी ठेवण्यासाठी माधव आणि आनंदीचा प्रपंच सुरु असतो. अचानक सधन दाम्पत्य पल्लवी देशपांडे (स्पृहा जोशी) आणि राजन देशपांडे (अभिजित खांडकेकर) पुण्याहून रत्नागिरीत येतात आणि शंकर आपला मुलगा असल्याचे सांगतात. जन्मापासून मूकबधिर आईवडिलांसोबत वाढल्यामुळे शंकर मूकबधिर नसूनही त्याला बोलता येत नसतं. त्यामुळे माधव-आनंदीसोबत मुलाचं भवितव्य अधांतरी असल्याचं सांगत पल्लवी-राजन देशपांडे न्यायालयात खटला दाखल करतात. माधव-आनंदीला न्यायालयात खटला जिंकण्यासाठी शंकरला बोलतं करणं गरजेचं असतं. आता शंकरला अखेर बोलता येतं का? न्यायालय कोणाच्या बाजूने निकाल देतं? शंकर खरंच पल्लवी-राजन देशपांडेचा मुलगा असतो का? माधव आपल्या मुलासाठी काय-काय क्लुप्त्या करतो? या भावनिक खेळात पुढे काय होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘बाबा’ हा सिनेमा बघावा लागेल.

चित्रपटाची गोष्ट इंटरेस्टिंग आहे. दिग्दर्शक राज गुप्तानं ती फुलवलीही उत्तम आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सिनेमात मोजके संवाद असले तरीही हा सिनेमा आपल्याशी उत्तम संवाद साधतो. संवाद जास्त नसतांनाही सिनेमाचा आशय तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतो. माधव-आनंदीसाठी आपल्याला सहानुभुती कधी वाटायला लागते हे कळतंही नाही. नकळत आपण या विश्वात गुंतुन जातो. चित्रपटातील घटनांचा क्रमही वेगवान आहे. अगदी सुरुवातीपासूनच हा सिनेमा विषयाला हात घालतो. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर हास्याची एक झालर बघण्यासाठी धडपड करणारा बाप उत्तमरित्या या सिनेमातून अधोरेखित करण्यात आला आहे.

आपल्या मुलाच्या तोंडून एकतरी शब्द बाहेर पडावा यासाठी जीव तोडून प्रयत्न करणारा माधव बघून नकळत आपल्या डोळ्याच्या कडा पाणावतात. खरंतर हा विषय मोठ्या पडद्यावर हाताळणं दिग्दर्शकासमोर मोठं आवाहन होतं. कारण बऱ्याच दृश्यांमध्ये सिनेमा फक्त हावभावातून व्यक्त होतो. संवादांचा अभाव असल्यामुळे सिनेमा कंटाळवाणा होण्याची भीती होती, मात्र मोठ्या सचोटीने दिग्दर्शकानं हे शिवधनुष्य पेललं आहे. माधव-आनंदी ज्याप्रमाणे शंकरशी संवाद साधत असतात ते निव्वळ अप्रतिम आहे. केवळ प्रेमापोटी निःस्वार्थीपणे मदत करणारा माधवचा मित्र,माधवला मनापासून मदत करु इच्छिणारे वकील आणि पोलिस अधिकारी यांच्या भूमिका बघुन काही रक्तापलीकडील नातीही श्रेष्ठ असू शकतात, याचा प्रत्यय येतो.

‘ओंमकारा’, ‘तनु वेड्स मनु’, ‘दबंग-2’ सारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या दीपक दोब्रियालनं या सिनेमाद्वारे मराठीत पदार्पण केलं आहे. दीपकला सिनेमात एकही संवाद नसला तरी हाव-भावांद्वारे त्याने केली आहे. मुलासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारा माधव दीपकनं अप्रतिम वठवला आहे. नंदितानंही आनंदीच्या भूमिकेत त्याला उत्तम साथ दिली आहे. दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव शब्दांपेक्षा जास्त तीव्र आहेत. शेवटच्या काही मिनिटांमध्ये तर या जोडीनं कमाल केली आहे. छोट्या शंकरच्या भूमिकेत आर्यन मेघजी या बालकलाकारानं सगळयांच लक्ष वेधलं आहे. आर्यन पडद्यावर प्रचंड गोड दिसला आहे. सिनेमा बघतांना त्याच्यावरुन अजिबात नजर हटत नाही. स्पृहा जोशीनंही मुलाच्या विरहात बुडालेली पल्लवी अप्रतिम वठवली आहे. अभिजीतनंही धीरगंभीर राजन उत्तम वठवला आहे. माधवच्या मित्राच्या भूमिकेत चित्तरंजन गिरीनं धमाल केली आहे. जयवंत वाडकर, शैलेश दातार, तेजस देऊस्करनंही त्यांच्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत.

रोहन-रोहनच्या संगीतानं सजलेलं ‘अडगुलं-मडगुलं’ गाणं भन्नाट झालंय. अर्जुन सोरटेंची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम झाली आहे. 90च्या दशकातील कोकणातील छोटं गाव त्यांनी उत्तमरित्या उभं केलं आहे. कॅमेऱ्यात कैद केलेलं निसर्ग सौंदर्य लाजवाब आहे. एकूणच काय उत्तम कलाकृती करण्यासाठी भाषेचं बंधन नसतं. कथेत दम असेल तर नक्कीच अप्रतिम कलाकृती होते, दे दिग्दर्शक राज गुप्तानं दाखवून दिलं आहे. हसता-हसता नकळत डोळ्यात पाणी आणणारा ‘बाबा’ सगळ्यांनी एकदा बघावा असा आहे. ‘टीव्ही नाईन मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय 4 स्टार्स.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.