फिरायला गेले अन् पावसाच्या पाण्यात अडकले, महाराष्ट्रातील 35 पर्यटकांसोबत काय घडलं?

महाराष्ट्रातील 35 पर्यटक गुजरातमध्ये फिरायला गेले होते. मात्र, औरंगा नदीला पूर आल्यामुळे त्यांची बस अडकली. आता गुजरात सरकारच्या मदतीने पर्यटकांचे हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्यात आले.

फिरायला गेले अन् पावसाच्या पाण्यात अडकले, महाराष्ट्रातील 35 पर्यटकांसोबत काय घडलं?
Auranga River
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 23, 2026 | 3:31 PM

गुजरातमध्ये पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील जवळपास ३५ पर्यटक पुराच्या पाण्यात अडकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील औरंगा नदीच्या पूरस्थितीत घडली. खासगी ट्रॅव्हल बसने फिरायला गेलेले हे पर्यटक नदीला पूर आल्यामुळे अडकले होते.

जालना, संभाजीनगर (औरंगाबाद) आणि परभणी जिल्ह्यातील हे पर्यटक गुजरातच्या विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी निघाले होते. प्राथमिक माहितीनुसार, या ३५ पर्यटकांपैकी १७ जण जालना जिल्ह्यातील आहेत. उर्वरित पर्यटक संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यातील आहेत. सर्वजण एका खासगी ट्रॅव्हल बसने प्रवास करत होते.

तात्काळ मदत आणि रेस्क्यू ऑपरेशन

नदीच्या पुराच्या पाण्यात बस अडकल्याची माहिती मिळताच गुजरात प्रशासनाने तात्काळ हालचाल केली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पूराच्या पाण्यामुळे रस्ता पूर्णपणे बुडाल्याने रोड मार्गाने रेस्क्यू शक्य नव्हते. त्यामुळे प्रशासनाने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.

हेलिकॉप्टरद्वारे एक एक करून सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. गुजरातच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “सर्व पर्यटक सध्या सुरक्षित आहेत. त्यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. त्यांना आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि मदत पुरवण्यात आली आहे.”

कुटुंबियांशी साधला संपर्क

या घटनेमुळे जालना, संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पर्यटकांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुजरात प्रशासनाच्या त्वरित कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली. सर्व पर्यटक सुखरूप असल्याचे कळताच कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

आसाममध्येही पूरपरिस्थिती

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून राज्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. गेल्या 24 तासांत पूराशी संबंधित विविध घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला असून, लाखो नागरिकांना या आपत्तीचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून शिवसागर, डिब्रुगढ, जोरहाट, गोलाघाट, चराईदेव, धेमाजी, तिनसुकिया, नगाव, बिस्वनाथ, कामरूप आणि कार्बी आंगलाँगसह एकूण 16 जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले आहेत. या पूरामुळे राज्यातील 5.64 लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत.

Follow Us