ट्रकच्या हेडलाईटमुळे घात झाला, एका क्षणात 5 जणांचा जीव गेला; अंधाराचा फायदा घेऊन ड्रायव्हरही पळाला

बिहारच्या अरवलमध्ये शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ट्रक आणि टेम्पो समोरासमोर आल्याने हा अपघात झाला. त्यात पाच प्रवासी जागीच ठार झाले. तर अनेकजण जखमी झाले आहेत. अंधाराचा फायदा घेऊन ट्रक चालक पसार झाला आहे.

ट्रकच्या हेडलाईटमुळे घात झाला, एका क्षणात 5 जणांचा जीव गेला; अंधाराचा फायदा घेऊन ड्रायव्हरही पळाला
accident cases
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 06, 2023 | 8:33 AM

पटना : बिहारच्या अरवल येथे शुक्रवारी रात्री महामार्गावर भीषण अपघात झालाय. खोखडी येथील वळणावर वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेत टेम्पोचा चक्काचूर झाला. हा अपघात इतका भीषण होता की टेम्पोचे टपच उडून गेले. या अपघातात टेम्पोतील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात पाठवले. मृतदेहही शवविच्छेदानासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. या अपघात एक महिला, एक मुलगा आणि तीन पुरुष ठार झालेत. मृतकांच्या नातेवाईकांनी या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या अपघाताचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

ट्रक चालक पसार

राष्ट्रीय महामार्ग -139 वर शुक्रवारी रात्री हा भीषण अपघात झाला. ट्रक आणि टेम्पो समोरा समोरून येत होते. त्यावेळी साईडला गाडी घेण्याच्या नादात टेम्पोने ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे टेम्पोचा चक्काचूर झाला. एवढेच नव्हे तर अपघात एवढा भीषण होता की टेम्पोचं संपूर्ण टपच उखडून गेलं. या अपघातानंतर ट्रक चालक प्रचंड घाबरला.

अंधाराचा फायदा घेऊन हा ट्रक चालक पायी चालत पळून गेला, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. ट्रकच्या रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारे आता ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे. या अपघातामुळे ट्रक आणि टेम्पो रसत्यावरच थांबले. त्यानंतर स्थानिक आणि पोलिसांनी बचाव कार्य सुरू केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. मध्यरात्री वाहतूक कोंडी झाल्याने लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगली गोची झाली होती.

दीड तासानंतर वाहतूक कोंडी सुटली

तब्बल तासाभरानंतर पोलिसांनी रस्त्यावरील दोन्ही वाहने हटवली. त्यामुळे रस्ता खुला झाला अन् वाहतूक कोंडीही कमी झाली. मात्र, तरीही वाहतूक सुरळीत होण्यासाठी दीड तास लागला. आज दुपारी या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. अपघाताचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक आमदारही घटनास्थळी आले होते. पोलीस आणि आमदारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला.

असा झाला अपघात

समोरून येणाऱ्या ट्रकला साईड देण्याच्या नादात हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. समोरून ट्रक येत होता. त्यामुळे ट्रकला साईड देण्याचा प्रयत्न टेम्पोचालक करत होता. परंतु ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशामुळे त्याचे डोळ्यावर अंधारी आली आणि टेम्पो थेट ट्रकला जाऊन धडकला. त्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवली आहे.