
दिल्लीत पराभव झाल्यानंतर आम आदमी पार्टीला सत्तेतून बाहेर जावं लागलं आहे. त्यानंतर भाजपने दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी कंबरल कसलेली आहे. मात्र, दिल्लीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांच्यासमोर नवं राजकीय संकट उभं राहिलं आहे. केजरीवाल यांच्या पक्षात आता पडझड सुरू झाली आहे. आपच्या तीन नगरसेवकांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तिन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता फुटीचं हे लोण आमदारांपर्यंत पोहचतं का? हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.
आपचे नगरसेवकर भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यात अँड्र्यूज गंजमधील नगरसेविका अनिता बसोया, आरकेपूरमचे नगरसेवक धर्मवीर आणि चपराना वॉर्ड क्रमांक 152 चे नगरसेवक निखिल यांचा समावेश आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचंड विजय झाला आहे. त्यामुळे आपमध्ये अस्वस्थता होती. अरविंद केजरीवाल यांच्या एकाधिकारशाहीमुळे हा पराभव झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच पुढील महिन्यात होणाऱ्या दिल्ली महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सेफ गेम खेळता यावा म्हणून या नगरसेवकांनी भाजपची वाट धरल्याचं सांगितलं जात आहे.
पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये दिल्ली पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आहे. त्यामुळे भाजपने आपलाच महापौर बसावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. आता भाजपच्या संख्याबळात आणखी तीनने वाढ झाल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नोव्हेंबर 2024मध्ये दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक झाली होती. महापौरपदाचा कार्यकाळ फक्त पाच महिन्याचा होता. या निवडणुकीत आपने विजय मिळवला होता. आपचे महेश शिंची हे महापौर बनले होते. केवळ तीन मतांनी ते विजयी झाले होते. त्यामुळे भाजपच्या किशनलाल यांचा पराभव झाला होता. महापौरपदाच्या निवडणुकीत 263 मते पडली होती. त्यात महेश खिंची यांना 133 तर किशन लाल यांना 130 मते मिळाली होती. तर दोन मते बाद झाली होती. आता तीन नगरसेवक सोबत आल्याने भाजप आणि आपचं संख्याबळ बरोबरीचं झालं आहे. निवडणुकीसाठी अजून एक महिना बाकी आहे. त्यामुळे या महिन्याभरात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आपला तिसऱ्यांदा सत्ता बनवता आली नाही. आपचा मोठा पराभव झाला आहे. या निवडणुकीत आपला फक्त 22 जागा मिळाल्या. तर भाजपला 48 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत तब्बल 22 वर्षानंतर भाजपचा मुख्यमंत्री बसणार आहे. भाजपने अद्यापही मुख्यमंत्री ठरवलेला नाही. मुख्यमंत्रिपदासाठीची संभाव्य 15 नावे भाजपने काढली आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचा सस्पेन्स अद्याप बाकी आहे.