Agnipath Protest : ‘अग्निपथ’वरून राडा सुरुच, आंदोलकांनी पोलीस स्टेशन जाळलं, पोलिसांच्या वाहनांचीही राख! तरुणाईचा गैरसमज कसा दूर होणार?

| Updated on: Jun 17, 2022 | 4:59 PM

बिहारमधील नालंदा येथील इस्लामपूर रेल्वे स्थानकावर अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ हुल्लडबाज विद्यार्थ्यांनी स्थानकावर उभ्या असलेल्या मगध एक्सप्रेसच्या 4 बोगी पेटवून दिल्या. यावेळी दगडफेकही करण्यात आली. स्थानकाभोवती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Agnipath Protest : अग्निपथवरून राडा सुरुच, आंदोलकांनी पोलीस स्टेशन जाळलं, पोलिसांच्या वाहनांचीही राख! तरुणाईचा गैरसमज कसा दूर होणार?
'अग्निपथ'वरून राडा सुरुच
Image Credit source: twitter
Follow us on

बिहार : अग्निपथवरून (AGNIPATH) सध्या देशभरात जोरदार राडा सुरूच आहे. अनेक राज्यातली तरुणाई या योजनेला विरोध करत रस्त्यावर उतरली आहे. बिहारमधील (Bihar Protest) जाळपोळही सुरूच आहे. आज बिहारमध्ये लोकांनी पोलीस स्टेशनही सोडलं नाही. भडकलेल्या आंदोलकांनी पोलीस स्टेशन (Bihar Police) तर जाळलेच मात्र त्यांनी पोलीस स्टेशनबाहेरची वाहनंही सोडली नाहीत. पोलिसांच्या वाहनांचीही राख झाली आहे. बिहारमधील नालंदा येथील इस्लामपूर रेल्वे स्थानकावर अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ हुल्लडबाज विद्यार्थ्यांनी स्थानकावर उभ्या असलेल्या मगध एक्सप्रेसच्या 4 बोगी पेटवून दिल्या. यावेळी दगडफेकही करण्यात आली. स्थानकाभोवती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशीच परिस्थिती सध्या अनेक ठिकाणी आहे. विशेष म्हणजे आंदोलनं झालेली सर्वात जास्त राज्ये ही भाजपशासित आहेत. त्यामुळे या योजनेवरून दोन्ही बाजुने प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

काय आहे अग्निपथ योजना?

  1. अग्निपथ योजनेच्या भरतीसाठी 17 ते 21 ची वयोमर्यादा असणार आहे.
  2. इच्छूक उमेदवार 10 वी किंवा 12 वी पास असणे गरजेचे आहे.
  3. सैन्यातील ही भरती चार वर्षांसाठी असेल असे सांगण्यात आले आहे.
  4. चार वर्षाच्या सेवेनंतर कामगिरीच्या आधारे मूल्यांकन होणार आहे.
  5. भरती झालेल्या जवानांपैकी 25 टक्के जवानांना लष्करी सेवेत सामावून घेतलं जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आलं आहे.

तेजस्वी यादवांचे सरकारला सवाल

बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी ‘अग्निपथ’ योजनेवर निशाणा साधला आहे. 4 वर्षांच्या करारावर बहाल केलेल्या अग्निवीरांना नियमित सैनिकांप्रमाणे वर्षभरात 90 दिवसांची रजा मिळणार का? अग्निपथ योजना न्यायप्रविष्ट असेल तर त्यात कंत्राटी अधिकाऱ्यांची भरती का केली जात नाही, असा प्रश्न तेजस्वी यांनी उपस्थित केला. फक्त कंत्राटी सैनिकांचीच भरती का? ही मनरेगा सुशिक्षित तरुणांसाठी आहे का? असे अनेक सवाल त्यांनी केले आहेत. त्यामुळे आता यावरून राजकारण आणकी तापताना दिसतंय.

अनुराग ठाकूर यांच्या बैठकीबाहेर राडा

हिमाचल प्रदेशातील उना येथे अग्निपथ योजनेविरोधात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर गदारोळ करण्यात आलाय. यावेळी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, अनुराग ठाकूर यांनी ही क्रांतिकारी योजना असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रसेवा आणि अग्निवीरांना चांगला पैसा मिळाल्यानंतर इतर नोकऱ्यांचे मार्ग खुले होतील, असे ते म्हणाले. मात्र हे आंदोलन अजूनही शांत व्हायचं नाव घेत नाहीये.