
गेल्या महिन्यात बारामतीत झालेल्या अपघाताने महाराष्ट्र हादरला. त्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यास 5 जणांचा मृत्यू झाला. अजित दादांच्या धक्का अजून कमी होत नाहीये तोच देशात आणखी एक मोठा विमान अपघात झाला. झारखंडची राजधानी रांची येथून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या एअर अँब्युलन्सचा अपघात होऊन 7 जण दगावले. चतरा जवळ सोमवारी संध्याकाळी हे विमान कोसळलं आणि मोठ्ठा स्फोट झाला, यात विमानातील एकही प्रवासी वाचला नाही. 7 ही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात फक्त एकाच रुग्णाचा मृत्यू झाला नाहीतर, त्याच्यासोबतकच एक डॉक्टरचाही मृत्यू झाला.
रांची येथून सव्वासातच्या सुमारास निघालेल्या विमानाचा संपर्क तुटला आणि नंतर थेट समोर आली ते विमान क्रॅश झाल्याची बातमी. यामध्ये क्रिटिकल केअर ॲनेस्थेशियाचे तज्ज्ञ डॉ.विकास गुप्ता यांच्यासह एकूण 7 जणानी जीव गमावला. या अपघातात मारले गेले डॉ. विकास गुप्ता हे मूळचे बिहारचे रहिवासी आहेत, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते पत्नी आणि 8 वर्षांच्या मुलासह झारखंडची राजधानी रांची येथे कचहरी क्षेत्रात रहात होते. त्यांची पत्नी एसबीआय कचहरी शाखेत कार्यरत आहे. त्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात.
एअर अँब्युलन्समधून रुग्णाला दिल्लीला नेतानाच अपघात
डॉ. विकास हे क्रिटिकल केअर ॲनेस्थेशिया क्षेत्रातील एक प्रसिद्ध डॉक्टर होते. रांचीच्या न्यायपालिका, प्रशासकीय अधिकारी आणि असंख्य प्रमुख व्यक्तींशी त्यांचे खोल आणि वैयक्तिक संबंध होते. ते रुग्णांसाठी फक्त डॉक्टर किंवा जीव वाचवणारे नव्हते तर, आपत्कालीन परिस्थितीत त्यांची कौशल्यं आणि शांत स्वभावामुळे सर्वजण त्यांचा आदर, सन्मान करायचे. लातेहारमधील चांदवा येथील रहिवासी असलेल्या संजय कुमार या भाजलेल्या रुग्णाची काळजी घेण्यासाठी रेडबर्ड एअरवेजच्या मेडिकल इव्हॅक्युएशन विमानात डॉ विकास होते. ते त्याला घेऊन दिल्लीला जात होते. राजधानीत चांगले उपचार होतील या आशेने, रांचीच्या देवकमल रुग्णालयातून त्या रुग्णाला दिल्लीत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु खराब हवामान आणि डायव्हर्जनच्या प्रयत्नांमुळे हे विमान चतरा जिल्ह्यातील सिमरिया पोलिस स्टेशन परिसरातील घनदाट जंगलात कोसळलं अशी माहिती समोर आली आहे.
दुर्घटनेतील मृतांची माहिती व तपशील
विमानातील सर्व सातही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, त्यांची ओळख खालीलप्रमाणे :
1) कॅप्टन विवेक विकास भगत
2) कॅप्टन सवराजदीप सिंह
3) संजय कुमार
4) डॉ. विकास कुमार गुप्ता
5) सचिन कुमार मिश्रा
6) अर्चना देवी
7) धुरु कुमार
या भयानक दुर्घटनेमुळे रांचीच्या वैद्यकीय आणि सामाजिक वर्तुळात शोकाचं वातावरण आहे. डॉ. विकास यांचे जवळचे मित्र, सहकारी आणि त्यांच्या रुग्णांचे कुटुंबीय शोकाकूल आहेत. डॉ. विकास यांचं कुटुंब, विशेषतः त्यांची पत्नी आणि लहान मुलगा यांच्यावर तर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. त्या लहान मुलाला त्याचे वडील पुन्हा भेटूच शकणार नाहीत. या दुर्घटनेमुळे, विकास यांच्या अचानक मृत्यूमुळे पुन्हा एकदा एअर अँब्युलन्स सेवांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि AAIB मधील तपास पथके ब्लॅक बॉक्स आणि हवामानशास्त्रीय घटकांची तपासणी करत आहेत.