पंजाबमध्ये भाजप भूईसपाट, तर हरसिमरत कौर यांच्या मतदारसंघातच अकाली दल बॅकफुटवर!

| Updated on: Feb 17, 2021 | 3:53 PM

पंजाबमध्ये भाजपचं पानीपत झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत सत्तेतून बाहेर पडलेल्या अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांच्या मतदारसंघात अकाली दलही बॅकफुट असल्याचं दिसून येत आहे.

पंजाबमध्ये भाजप भूईसपाट, तर हरसिमरत कौर यांच्या मतदारसंघातच अकाली दल बॅकफुटवर!
Follow us on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये स्थानिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीवर शेतकरी आंदोलनाचा थेट परिणाम पडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, आज हाती आलेल्या निकालानुसार पंजाबमध्ये भाजपचं पानीपत झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत सत्तेतून बाहेर पडलेल्या अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांच्या मतदारसंघात अकाली दलही बॅकफुट असल्याचं दिसून येत आहे.(Akali Dal on backfoot in Harsimrat Kaur Badal’s constituency)

पंजाबमध्ये 14 फेब्रुवारी रोजी आठ नगरपालिका, 109 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. भटिंडाच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या मतदारसंघात अकाली दलाला मोठा झटका बसलाय. भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीत तर अनेक जागांवर खातंही उघडू शकली नाही. तर सत्ताधारी काँग्रेसनं मात्र महापालिकांसह नगरपालिका आणि नगर परिषद निवडणूक बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे.

अकाली दलालाही मोठा फटका

भटिंडामध्ये 50 जागांवर झालेल्या निवडणुकीत तब्बल 47 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे. तर अकाली दलाला फक्त 3 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. भाजप आणि आप तर इथे खातंही उघडू शकली नाही. अबोहर नगर पालिका निवडणुकीत 50 जागांपैकी काँग्रेसनं तब्बल 49 जागा जिंकल्या आहेत. तर अकाली दलाच्या वाट्याला फक्त एक जागा आलीय.

सनी देओलच्या मतदारसंघात भाजपला धोबीपछाड

अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलच्या मतदारसंघात काँग्रेसनं भाजपला चितपट केलंय. सर्व 29 जागांवर काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीत याच गुरदासपूरच्या नागरिकांनी सनी देओलला मोठ्या अभिमानाने निवडून दिलं होतं. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. तिकडे होशियारपूरमध्ये 50 पैकी काँग्रेसनं 41 जागांवर विजय संपादन केलाय. तिथे भाजपच्या खात्यात 3, आपला 2 तर जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

शेतकरी आंदोलनाचा काँग्रेसला फायदा?

शेतकरी आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत, अशी भूमिका मांडली होती. याशिवाय संसदेच्या अधिवेशनातही त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. त्यामुळे पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं दिसत आहे.

संबंधित बातम्या :

पंजाबमध्ये भाजपचं पानीपत? सनी देओलच्या मतदारसंघातील सर्व 29 जागांवर पराभव

गुजरातमध्ये स्थानिक निवडणुकीत काँग्रेसचं युवकांसाठी थेट ‘डेटिंग डेस्टिनेशन’चं आश्वासन!

Akali Dal on backfoot in Harsimrat Kaur Badal’s constituency