Special report | पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले का होतात?, अमित शाह काय म्हणाले?

| Updated on: Dec 20, 2020 | 8:15 PM

पश्चिम बंगालमध्ये भाजप घराघरात पोहोचला आहे. त्यामुळेच आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत," असा आरोप अमित शाह यांनी केला (Amit Shah West Bengal)

Special report | पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले का होतात?, अमित शाह काय म्हणाले?
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे (Bengal Election 2021) वारे वाहू लागले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आतापासूनच तयारीला लागला आहे. “पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मागील 6 वर्षांपासून तयारी करत आहे. या ठिकाणी भाजप घराघरात पोहोचला आहे. त्यामुळेच आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत,” असा आरोप भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. ते पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ‘टिव्ही 9’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी हे विधान केले. (Amit Shah exclusive interview on West Bengal state assembly election)

अमिश शाह पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. भाजपची आगामी विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. शाह यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. यावेळी बीरभूम येथील बोलपूर येथे विशाल रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मागील 6 वर्षांपासून विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांमध्ये भीतीचं वातावरण

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याही ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. याविषयी बोलताना, शाह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “पश्चिम बंगालमध्ये भाजप घराघरात पोहोचल्याने विऱोधकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याच भीतीपोटी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत,” असा आरोप अमित शाह यांनी विरोधकांवर केला. तसेच, या हल्ल्यामुळे ज्या भाजप कार्यकर्त्यांना त्रास होत आहे, त्यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

इनकमिंगमुळे भाजपला फायदा होणार ?

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामध्ये शुभेंदू अधिकारी यांच्यासारख्या बड्या नेत्याचा समावेश आहे. तृणमूलच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यावर नेमका काय फायदा होणार,  असा प्रश्न या निमित्ताने भाजपला विचारला जात आहे. याविषयी बोलताना “भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश करत आहेत. त्यापैकी शुभेंदू अधिकारी यांचाही समावेश आहे. त्यांच्या प्रवेशामुळे तृणमूल काँग्रेसला फरक पडणार नसला तरी भाजपला त्याचा नक्की फायदा होईल,” असा दावा शाह यांनी केला.

खुदीराम बोस, विवेकानंद, टागोर भाजपसाठी श्रद्धास्थान

अमित शाहा यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांची कर्मभूमी असलेल्या विश्वभारती विश्वविद्यालयाला भेट दिली. याविषयी बोलताना, रवींद्रनाथ टागोर यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे मला भाग्य मिळाले. मी स्व:तला नशीबवान समजतो, असे शाह म्हणाले. तसेच, भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद आणि खुदीराम बोस नेहमीच प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कडून आम्हाला प्रेरणा मिळते असेही शाह यांनी सांगितले.

बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)

    1. तृणमूल काँग्रेस -219
    2. काँग्रेस -23
    3. डावे – 19
    4. भाजप – 16
    5. एकूण – 294

 

संबंधित बातम्या :

ममता बॅनर्जींना मोठा झटका, अमित शाहांच्या बंगाल दौऱ्याआधी टीएमसीच्या 3 मोठ्या नेत्यांचा राजीनामा

ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी भाजपचा खास प्लॅन; ‘हे’ पाच नेते गेमचेंजर ठरणार?

ओवैसी आता ममतादीदींना भिडणार, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी MIM चा शड्डू

(Amit Shah exclusive interview on West Bengal state assembly election)

 

अमित शाह यांची exclusive मुलाखत