‘घुसखोर हीच काँग्रेसची व्होटबँक, फोडा आणि राज्य करा अशी त्यांची रणनिती’, अमित शाहांचा घणाघात

| Updated on: Jan 24, 2021 | 6:07 PM

काँग्रेसची रणनिती ही इंग्रजांसारखी फोडा आणि राज्य करा, अशी आहे, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला (Amit Shah slams Congress in Assam)

घुसखोर हीच काँग्रेसची व्होटबँक, फोडा आणि राज्य करा अशी त्यांची रणनिती, अमित शाहांचा घणाघात
Follow us on

दिसपूर (आसाम) : “काँग्रेस आणि ऑल इंडिया डेमोक्रेटिक फंडचे संस्थापक बदरुद्दीन अजमल हे घुसखोरांसाठी सारे दरवाजे उघडतील. कारण तीच त्यांची व्होटबँक आहे. काँग्रेसची रणनिती ही इंग्रजांसारखी फोडा आणि राज्य करा, अशी आहे”, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. आसामच्या नालबारी येथे विजय संकल्प कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी घुसखोरांना फक्त भाजप सरकार रोखू शकतं, असा दावा केला (Amit Shah slams Congress in Assam).

“जे कित्येक वर्षांपासून इथे सरकारमध्ये आहेत त्यांनी आसामच्या संस्कृतीसाठी काय केलं? असा प्रश्न मला त्यांवा विचारायचा आहे. मतं गोळा करण्या व्यतिरिक्त या लोकांनी आणखी काही केलेलं नाही. एनडीएने आसासमध्ये शंकरदेव यांच्या सन्मानार्थ काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत”, असं अमित शाह म्हणाले.

“काँग्रेस अनेकदा भाजपवर सांप्रदायिकतेचा आरोप करते. मात्र, तीच काँग्रेस केरळमध्ये मुस्लीम लीगसोबत आहे तर आसाममध्ये काँग्रेसने बदरुद्दीन अजमलसोबत युती केली आहे. काँग्रेस आसामला कोणत्या दिशेला घेऊन जात आहे?”, असा सवाल त्यांनी केला.

“कलम 370 ला कुणीही हात लावू शकत नव्हतं. मात्र, आम्ही त्याबाबतचा निर्णय करुन दाखवला. प्रभू श्रीरामांचे मंदिर बनवण्याबाबत देशभरातून आवाज उठत होता. काँग्रेस इंग्रजांच्या नितीवर चालत राहिली. लोकांमध्ये फूट पाडा आणि राज्य करा, अशी त्यांची रणनिती आहे. आसाममध्ये इतके दिवस त्यांनी तेच केलं. काँग्रेसने लोकांना आपसात लढवत आसामला रक्तरंजित केलं. यामध्ये 10 हजार पेक्षा जास्त युवकांचं रक्त सांडलं आहे”, असं शाह म्हणाले (Amit Shah slams Congress in Assam).

“आसाममध्ये विकासाची गाडी धावत आहे. नवे रस्ते, रुग्णालये, कॉलेज बनत आहेत. आगामी काळात पूराच्या समस्येवरही भाजप सरकार तोडगा काढेल. आम्ही आसामात शांतता प्रस्थापित केली आहे. आम्हाला पुढचे पाच वर्ष आणखी द्या”, असं आवाहन त्यांनी केलं.

हेही वाचा : काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा नाही; केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दावा