आम आदमी पक्षातील फुटीनंतर अण्णा हजारे संतापले, थेट नव्या कायद्याची मागणी; नेमकं काय म्हणाले?

Anna Hajare : आपच्या 7 राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम करत भाजपची वाट धरली आहे. अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या राजकीय घडामोडीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आम आदमी पक्षातील फुटीनंतर अण्णा हजारे संतापले, थेट नव्या कायद्याची मागणी; नेमकं काय म्हणाले?
Anna Hajare
Image Credit source: Google
| Updated on: Apr 24, 2026 | 8:57 PM

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा फटका बसला आहे. राघव चड्डा यांच्यासह पक्षातील 7 राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम करत भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खासदार फुटल्यानंतर आम आदमी पक्षाने भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या राजकीय घडामोडीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

काय म्हणाले अण्णा हजारे ?

आम आदमी पक्षात फूट पडल्यानंतर अण्णा हजारे यांनी, ‘पक्ष टिकण्यासाठी कायदा तयार होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाही. सत्ता आणी पैसा याच्या लालचमध्ये येऊन नेते इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जात आहेत, मनमर्जी प्रमाणे पक्ष बदलत आहेत. त्यामुळे लोकांनी निवडून देताना चारित्र्यशील लोकं निवडून दिलं पाहिजे. हे जे चाललं आहे ते स्वर्थसाठी चाललं आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं चाललं आहे. आज समाज आणि देश डोळ्यासमोर राहिला नाही’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्या खासदारांना फोडलं जात आहे…

7 खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर आपचे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, ‘ऑपरेशन लोटसचा खेळ खेळला जात आहे. आमच्या खासदारांना फोडले जात आहे. त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले जात आहे. ईडी-सीबीआयचा वापर केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक मित्तल यांच्याकडे ईडीचा छापा पडला होता. या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. ईडीचा छापा पडला आणि त्यांना फोडले. याचा अर्थ भीती दाखवून आणि प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून ऑपरेशन लोटस चालवले जात आहे.’

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

अरविंद केजरीवाल यांनीही खासदार फुटल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांनी आपल्या एक्स (ट्विटर)वर पोस्ट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते पोस्टमध्ये म्हणाले की, ‘भाजपने पुन्हा एकदा पंजाब्यांसोबत धक्का (अन्याय) केला.’

कोणत्या खासदारांनी आपची साथ सोडली?

  • राघव चड्ढा
  • अशोक मित्तल
  • स्वाती मालीवाल
  • हरभजन सिंग
  • संदीप पाठक
  • विक्रमजीत सिंह साहनी
  • राजेंद्र गुप्ता

Follow Us