‘भारत-चीन दररोज तीनवेळा आमनेसामने, ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही…’ काय म्हणाले लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी?

Upendra Dwivedi : लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 30 जून रोजी पदावरून निवृत्त होत आहेत. पद सोडण्यापूर्वी द्विवेदी यांनी शत्रूराष्ट्रांना मोठा इशारा दिला आहे.

भारत-चीन दररोज तीनवेळा आमनेसामने, ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही... काय म्हणाले लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी?
Army Chief General Upendra Dwivedi
Image Credit source: Google
| Updated on: Jun 29, 2026 | 10:53 PM

भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 30 जून रोजी पदावरून निवृत्त होत आहेत. अशातच आता द्विवेदी यांनी शत्रूराष्ट्रांना आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना स्पष्ट आणि कठोर इशारा दिला आहे. द्विवेदी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमुळे भारतासाठी एक नवा पायंडा निर्माण झाला आहे, जिथे आता दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणारे यांच्यात कोणताही फरक केला जाणार नाही. तसेच पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या धमक्यांची भीती भारतासाठी आता संपली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही…

जनरल द्विवेदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने हे सिद्ध केले आहे की अण्वस्त्रांची धमकी आता दहशतवादासाठी ढाल ठरू शकत नाही. भारताविरोधात आवाज उठवला तर त्याचे उत्तर अचूक, पूर्वनियोजित आणि अत्यंत विनाशकारी असेल. कारण ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. भारताची तयारी आणि निर्धार कायम असून पहलगाम हल्ल्याचा बदला ही केवळ सुरुवात होती. आता भारत दहशतवाद्यांना त्यांच्या ठिकाणी घुसून शिक्षा देण्याची क्षमता ठेवतो.’

रुद्र ब्रिगेड आणि भैरव बटालियन युद्धासाठी सज्ज

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, ‘भारतीय लष्कर आता केवळ सीमांचे संरक्षण करणार नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शत्रूला निर्णायक उत्तर देईल. यासाठी रुद्र ब्रिगेड, भैरव बटालियन आणि अश्वनी ड्रोन प्लाटून यांसारख्या अत्याधुनिक आणि घातक युनिट्स तयार करण्यात येत आहेत. “जमिनीवर स्मार्ट बूट, आकाशात गरुडासारखी नजर आणि क्लाऊडमध्ये बुद्धिमत्ता.” हे आमचे ब्रीदवाक्य आहे.

चीन आणि एलएसीबाबतही स्पष्ट भूमिका

चीन सीमेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, परिस्थिती सध्या स्थिर असली तरी ती संवेदनशील आहे आणि सतत सतर्क राहण्याची गरज आहे. दोन्ही देशांचे सैन्य गैरसमज टाळण्यासाठी आणि सीमावादाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी दरवर्षी 1,100 हून अधिक वेळा स्थानिक पातळीवर चर्चा करते. म्हणजेच सरासरी दररोज सुमारे तीन वेळा दोन्ही देशांचे अधिकारी संवाद साधतात. पुढे बोलताना त्यांनी ‘LAC वर भारताची तैनाती अत्यंत मजबूत असून कोणत्याही आव्हानाला उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे.’ अशी माहिती दिली.

Follow Us