बांगलादेश कोणासोबत भारत की पाकिस्तान, चीनसोबत? सत्तेत येताच तारीक रहमान यांनी फोडला पहिला मोठा बॉम्ब
बागलादेशमध्ये आता बीएनपीची सत्ता आली आहे, त्यामुळे नव्या सरकारची भूमिका नेमकी काय असणार? बांगलादेश नक्की कोणासोबत असणार? भारत की पाकिस्तान आणि चीनसोबत, यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.

बांगलादेशमध्ये नुकतीच निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये तारिक रहमान यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने मोठं यश मिळवलं आहे. निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर बीएनपी पक्षाचे प्रमुख तारिक रहमान यांनी बांगलादेशमधील जनतेचे आभार मानले आहेत. बीएनपीचा विजय हा देशातील लोकशाही आणि जनतेचा विजय असल्याचं तारिक रहमान यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता बांगलादेशमध्ये सत्तापालट झाला आहे. तारीक रहमान हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तर अशा स्थितीमध्ये आता बांगलादेशचे भारत, पाकिस्तान आणि चीनसोबत कसे संबंध असणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर आता तारीक रहमान यांची शपथग्रहण सोहळ्यापूर्वीच पहिली प्रतिक्रिया आली आहे.
तारीक रहमान यांनी नेमकं काय म्हटलं?
येत्या काळात भारत, पाकिस्तान आणि चीनसोबत बांगलादेशचे संबंध कसे असणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, यावर बोलताना तारीक रहमान यांनी म्हटलं की आमचं सरकार हे चीन, भारत आणि पाकिस्तानसोबत बांगलादेशच्या हिताचं संरक्षण करणाऱ्या नीतींचं पालन करेल. दरम्यान यावेळी त्यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आमचं परराष्ट्र धोरण हे येथील जनतेला अनुकूल असं असेल. शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची बाब ही कायदेशी प्रक्रियेवर अवलंबू असेल असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या आमच्यासमोर अनेक आव्हान आहेत, आमची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. देशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. मागच्या सरकारने येथील प्रत्येक संस्थेचं राजकीयकरण केलं होतं, त्यामुळे सर्वात आधी देशात सुशासन स्थापन करणे हेच आमचं उद्दिष्ट असणार आहे, आम्ही बांगलादेशमध्ये इतर देशांमधून गुंतवणूक आणू, देशात रोजगार वाढवू असं तारीक रहमान यांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे बांगलादेशमध्ये तारीक रहमान यांची सत्ता येताच शेख हसीना यांच्यासंदर्भात बीएनपीच्या एका ज्येष्ठ नेत्यानं मोठं विधान केलं होतं. आम्ही शेख हसीना यांना बांगलादेशकडे सोपवण्यासाठी भारतावर दाबव टाकू असं विधान केलं होतं.
